जळगाव : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे- पाटील यांच्यात वार-पलटवार सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जरांगे-पाटील यांना दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी खडसे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर त्यांच्यावर मुक्ताईनगर, जळगाव, मुंबईत उपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर खडसे हे जिल्ह्यात दाखल झाले. शहरातील मुक्ताई या निवासस्थानी खडसे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : टंचाईमुळे व्हाॅल्व्हमधून गळणारे पाणी भरण्याची वेळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील वाकोदची स्थिती

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे- पाटील यांना आश्वासन दिले होते. यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतही देण्यात आली आहे. दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन, असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबतचा दिलेला शब्द फडणवीस यांनी पाळावा, असे खडसे यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचेही दुमत नाही; परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका सर्वपक्षीयांनी वेळोवेळी मांडली आहे. त्यामुळे यात कसा मार्ग काढावा, हे सरकारने ठरवावे. फडणवीस यांनी, मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन, असे वारंवार वक्तव्य केल्यामुळे समाजाच्या अपेक्षा उंचावल्या. त्यांनी दिलेला शब्द पाळावा, असेही खडसे यांनी नमूद केले.

हेही वाचा : भाजप मंत्र्याने मंचावरुन दिला ‘जय राष्ट्रवादी’चा नारा; नंतर केली सारवासारव

भुजबळ यांनी आयुष्यभर ओबीसींचे प्रश्न सातत्याने मांडले आहेत. त्यांची भूमिका आजची नाही, तर ती जुनीच आहे. हे करत असताना मराठा समाजाविषयी अथवा अन्य समाजाविषयी विषाची भावना असल्याचे कारण नाही. आपल्या समाजाविषयी आदर बाळगला पाहिजे, यात दुमत नाही. मात्र, दुसऱ्या समाजाविषयी दु:साहस असता कामा नये आणि ही भूमिका प्रत्येकाने पाळली पाहिजे. सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी या संकटात पुढाकार घ्यावा आणि मार्ग काढावा, अशी आमचीही संकटमोचकांकडून अपेक्षा आहे, असा टोलाही मंत्री महाजन यांना हाणला. वारंवार मराठा समाजाला झुलवत ठेवणे, हे काही राजकीयदृष्ट्या योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : नाशिकची गडद दुष्काळाकडे वाटचाल; १३१ गावे, २३७ वाड्यांना टँकरने पाणी

कापसाला १२ हजारांचा भाव द्या

खान्देशातील जवळपास ८० टक्के जिनिंग-प्रेसिंग आज बंदावस्थेत आहेत. सूतगिरण्याही बंद आहेत. कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटलही भाव मिळत नाही. सरकारने किमान १२ हजार रुपये भाव देण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलप्रमाणे अनुदानापोटी पाच हजार रुपये दिले पाहिजेत किंवा सीसीआयच्या माध्यमातून १२ हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. गिरीश महाजन यांनी दहा वर्षांपूर्वी कापसाला प्रतिक्विंटल सात हजारांचा भाव मागितला होता आणि दहा वर्षांनंतरही सात हजार रुपये देत आहेत, म्हणजे ही शेतकऱ्यांची टिंगलटवाळी आहे, अशी टीका खडसे यांनी महाजन यांच्यावर केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon ncp leader eknath khadse demand cm eknath shinde dcm devendra fadnavis should keep their word regarding maratha reservation css
Show comments