नाशिक : पाणी टंचाईने भीषण स्वरुप धारण केले असून सात तालुक्यांतील २०३ गावे आणि ४३६ वाड्यांना २१० टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. टँकर आणि गावांसाठी जिल्ह्यात ६७ खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. मनमाडसारख्या शहरात महिन्यातून, नांदगावमध्ये २२ दिवसाआड तर चांदवडमध्ये पाच-सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. अशुध्द पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत. सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात टंचाईची झळ बसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालावरून एप्रिलमध्ये पाणी टंचाईची तीव्रता सर्वत्र वाढल्याचे समोर आले आहे. नांदगाव, येवला या तालुक्यास सर्वाधिक झळ बसत असून मालेगाव, चांदवड, बागलाण, देवळा व सिन्नरमधील अनेक गाव-वाड्यांची तहान टँकरद्वारे भागवावी लागत आहे. येवला तालुक्यात ६७ गावे-वाड्यांना (४५ टँकर), नांदगावमध्ये २६९ गाव-वाड्यांना (४९), बागलाण तालुक्यात ३२ गावे-वाडे (२५), मालेगाव ७४ गावे-वाड्या (२४), देवळा ५३ गावे-वाड्या (२५), सिन्नर तालुक्यात ७६ गावे-वाड्यांना (१६) टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात एकूण ६३९ गावे-वाड्यांची भिस्त टँकरवर आहे. टँकरच्या ४३६ फेऱ्या मंजूर असून प्रत्यक्षात ते ४३९ फेऱ्या मारत असल्याचे यंत्रणेने म्हटले आहे. आठ गावातील पाणी पुरवठा आठ तर टँकर भरण्यासाठी ६४ अशा एकूण ६७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेकडो गावे-वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत असताना आठ तालुक्यांमध्ये अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत. अर्थात तेथील काही भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.

हेही वाचा : नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

टंचाईत अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याच्या प्रश्नांनाही तोंड द्यावे लागत आहे. येवला व मनमाडमध्ये तशीच स्थिती आहे. येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण प्रकल्पात गाळ काढण्याची व्यवस्था नसल्याने प्युरिफायर फिरत नाही. अशुध्द पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. घरगुती पाणी शुध्द करणाऱ्या यंत्रांचा आणि येवला नगरपालिकेकडून खासगी संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. अनेक भागात शुध्द पाण्यासाठी नागरिकांना पैसा खर्च करावा लागत आहे.

हेही वाचा : नाशिक : सण, उत्सवांमुळे अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम

६७ विहिरींचे अधिग्रहण

गावासह टँकरसाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून बागलाण तालुक्यात २५, चांदवडमध्ये दोन, देवळा १६, मालेगाव १८, नांदगाव चार, येवला तालुक्यात दोन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : धुळ्यात बनावट मतदार ओळखपत्र तयार करणारा फोटो स्टुडिओ

नळ पाणी पुरवठ्याची स्थिती

मनमाड शहर – महिन्यातून एकदा
नांदगाव – २२ ते २३ दिवसाआड

चांदवड – पाच ते सहा दिवसाआड
येवला – पाच दिवसाआड

मालेगाव – दोन दिवसाआड
सटाणा – दिवसाआड

सिन्नर आणि वणी – दिवसाआड
नाशिक शहर – दररोज

हेही वाचा : दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी

नाशिकमध्ये अप्रत्यक्ष कपात ?

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४७ टक्के जलसाठा आहे. मनपा प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी बचतीसाठी आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा विचार केला होता. तथापि, निवडणूक काळात वेगळा संदेश जाईल, या धास्तीतून तो टाळला गेल्याची चर्चा होत आहे. एक ते दीड महिन्यापासून जल वाहिनीची देखभाल-दुरुस्ती, शुध्दीकरण केंद्राशी संबंधित कामांचे कारण देऊन अधूनमधून पाणी पुरवठा बंद केला आहे. याचा संबंध अप्रत्यक्षपणे कपातीशी जोडला जात आहे. नियमित आढावा आणि पुरेसा जलसाठा असल्याचे दर्शवत कपातीचा निर्णय होणार नाही, याची दक्षता घेतली गेल्याची चर्चा होत आहे. मनपाने पाण्याचा काटकसरीने वापर, वाहन व बगिच्यासाठी पिण्याच्या वापरास प्रतिबंध आदी सूचना केल्या आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik district water crisis water supplied through tankers in 639 villages css
Show comments