नाशिक : मे, जून आणि जुलै महिन्यात टंचाईची तीव्रता वाढते. त्यामुळे सद्यस्थितीत ज्या ठिकाणी कमी जलसाठा असेल, त्यांनी आतापासून बचतीचा विचार करावा, अशी सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. एकिकडे पाणी बचतीची सूचना देताना भुसे यांनी दुसरीकडे नाशिक शहरात तूर्तास पाणी कपातीची गरज नसल्याचे नमूद केले. नाशिक शहरात पाणी कमी पडणार नाही. त्यामुळे कपातीचा विषय नसल्याचे सांगत त्यांनी नाशिककरांना दिलासा दिला.
पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक पार पडली. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सर्वत्र टंचाईची तीव्रता जाणवत आहे. मनपाचे पाणी आरक्षण प्रारंभी ३१ जुलैपर्यंतचा वापर गृहीत धरून झाले होते. उपलब्ध पाण्याचे ३१ ऑगस्टपर्यंत नियोजन करावयाचे झाल्यास अखेरच्या टप्प्यात टंचाईला तोंड द्यावे लागू शकते. या परिस्थितीत अकस्मात कपात लागू होण्याची शक्यता वर्तविली जात असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तो निर्णय घेण्यास कुणी तयार नसल्याचे अधोरेखीत झाले.
हेही वाचा : पुणे-नाशिक रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे नेण्यास सत्यजित तांबे यांचा विरोध
मागील एका बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रखडलेल्या पाणी पुरवठा योजना, पाणी टंचाईच्या प्रश्नावर अनेक तक्रारी केल्या होत्या. या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीकडे मात्र अनेक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. यात भाजपच्या सर्वच लोकप्रतिनिधींचा समावेश होता. प्रारंभी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली शहाणे यांनी जलसाठ्याची माहिती दिली. भुसे यांनी अल निनोमुळे गेल्या वर्षी उद्भवलेली स्थिती कथन केली. त्यामुळे उपलब्ध पाणी अतिशय जपून वापरावे, त्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना केली.
हेही वाचा : नाशिक शहराचा प्रस्तावित वळण मार्ग विस्तारण्यास अडसर, सिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक
गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे निर्देश
काही दिवसांपासून शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ अशा घटना वाढत आहेत. या संदर्भातील प्रश्नावर पालकमंत्र्यांनी काही घटना अचानक वाद, व्यक्तिगत वादातून घडल्याचे नमूद केले. पोलीस यंत्रणा त्यांचे काम चोखपणे करत आहे. उपरोक्त घटनांमध्ये कुणीही सामील असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले.