नाशिक : सुरगाणा तालुक्यात मुसळधार पावसात काही घरांची पडझड झाली असून शनिवारी सकाळी नार नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. घाटमाथ्यावरील भागात पाच ते सहा दिवसांपासून संततधार सुरू होती. त्यामुळे हंगामात प्रथमच नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. दारणा, भावली, कडवा व नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग केला गेला होता. पाऊस कमी झाल्यानंतर या धरणांतील विसर्ग बराच कमी करण्यात आला. शनिवारी दारणातून २६२४, भावली ४८१, कडवा ६०० आणि नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ६३१० क्युसेक विसर्ग सुरू होता. सुरगाणा तालुक्यातील खोबळा येथे पार नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. याच तालुक्यातील साबरदरा येथे गोपाळ गुबाडे, उंबरपाडा येथील गुबाडे यांच्या घरांचे पावसाने अंशत: नुकसान झाले. आदल्या दिवशीही सुरगाण्यातील कुकडणे व त्र्यंबकेश्वरमधील देवडोंगरी येथे वादळी पावसाने काही घरांचे नुकसान झाले.

बहुतांश जिल्ह्यातून पावसाने उघडीप घेतली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात तुरळक पावसाची नोंद झाली. एक जून ते २७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ४४३ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा प्रत्यक्षात सरासरीच्या तुलनेत ३७० मिलिमीटर म्हणजे ८५.५ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावरील तालुक्यात पावसाचे प्रमाण आधीपासून कमी राहिले होते. त्यामुळे सुरगाणा, इगतपुरी व पेठ तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र १०३ टक्के पाऊस झाला आहे.

हेही वाचा : नाशिक महापालिकेची सिटीलिंक बससेवा पावणेदोन वर्षात १० वेळा ठप्प; पगार वाढीसाठी चालक संपावर, हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस

धरणसाठा ३५ टक्क्यांवर

पावसाअभावी तळ गाठण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये सप्ताहातील पावसाने मोठी भर पडून एकूण जलसाठा ३५.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ पैकी चार धरणे कोरडी आहेत. उर्वरित २० धरणांमध्ये २३ हजार १५० दशलक्ष घनफूट जलसाठा झाला. गेल्या वर्षी हेच प्राण २८ हजार ६२७ म्हणजे ४३.६० टक्के होते. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ३२०२ दशलक्ष घनफूट (५६ टक्के) जलसाठा झाला आहे.