नाशिक – राज्यातील ११ एकलव्य निवासी शाळांची संलग्नता प्रक्रिया केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) पूर्ण करण्यात आल्याने इयत्ता ११ वीत प्रवेशाच्या जागा ५४० ने वाढणार आहेत. त्यापैकी नऊ शाळांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून तर दोन शाळांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटीतर्फे (नाशिक) राज्यात इंग्रजी माध्यमाच्या ३७ एकलव्य निवासी शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे शिक्षण घेतात. या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते १२ वीपर्यंतचे वर्ग नैसर्गिक वर्गवाढीने सुरू करण्यास मान्यता मिळते. नुकतीच अक्कलकुवा, चणकापूर, पळसुंदे, सवणे, बोटोनी, चामोशी, गेवर्धा, ढोंगसांगळी, धडगाव तसेच शेंडेगाव आणि शिंदे दिगर या शाळांना सीबीएसई मंडळाचा इयत्ता ११ वी विज्ञान शाखेसाठी संलग्नता क्रमांक प्राप्त झाला. शेंडेगाव आणि शिंदे दिगर या दोन शाळांमध्ये आगामी तर उर्वरित शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश दिले जाणार आहेत.

हेही वाचा >>>नाशिकमधील जागावाटप तिढ्यावर शरद पवार यांचा तोडगा मान्य होणार का ?

दरम्यान, संलग्नता क्रमांक प्राप्त झाल्याने नऊ एकलव्य शाळांमध्ये प्रत्येकी ६० याप्रमाणे ५४० जागा ११ वी प्रवेशासाठी नव्याने उपलब्ध होणार आहेत. सीबीएसई मंडळाच्या निर्देशानुसार १६ऑक्टोबरपर्यंत पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

सीबीएसई मंडळाच्या अटींची पूर्तता

प्राचार्य आणि शिक्षक यांनी तांत्रिक अडचणींवर मात करून संलग्नता मिळविल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना सीबीएसईचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेण्यास मदत हाेणार आहे. सीबीएसई मंडळाच्या सर्व अटींची पूर्तता करून ११ शाळांना इयत्ता ११ वीसाठी सुधारित संलग्नता क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा इयत्ता १० वीनंतरच्या शिक्षणाचा प्रश्न निकाली निघाला आहे.- विनिता सोनवणे (उपायुक्त, आदिवासी विकास विभाग)