नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीजवळील जुना कसारा घाट दुरुस्ती कामामुळे २४ ते २७ फेब्रुवारी आणि तीन ते सहा मार्च या कालावधीत सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहने नवीन कसारा घाटमार्गे जातील. सायंकाळनंतर सकाळी आठपर्यंत ही वाहतूक जुन्या कसारा घाटातील नेहमीच्या मार्गाने होईल. या कालावधीत घाटातील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक निर्बंधांची अधिसूचना अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने काढली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जुन्या कसारा घाटात दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक-मुंबई दरम्यानच्या वाहतुकीत बदल करून काही निर्बंध घालण्यात आले. त्यानुसार या काळात मुंबई-नाशिक आणि नाशिक-मुंबई या घाटातील दोन्ही मार्गावर मध्यरात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.
जुन्या कसारा घाटात सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत वाहतूक बंद राहील. या काळात नाशिककडे जाणारी सर्व वाहने नवीन कसारा घाटातून मार्गक्रमण करतील. चिंतामणवाडी पोलीस चौकीसमोरून एकेरी मार्गाने वाहनांना मार्गस्थ होता येईल. सायंकाळी सहानंतर जुना कसारा घाट वाहतुकीसाठी पूर्णत: खुला राहणार आहे.
अवजड वाहनांना घाट बंद
२४ ते २७ फेब्रुवारी आणि तीन ते सहा मार्च या कालावधीत मुंबई-नाशिक आणि नाशिक-मुंबई या कसारा घाटातील दोन्ही मार्गांवर अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. अवजड वाहनधारकांना या काळात नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून इच्छितस्थळी जाता येईल. वाहतुकीचे हे निर्बंध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार असल्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. सुरेश मेकला यांनी नमूद केले आहे.