लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: तालुक्यातील धोबीवराड या गावात बिबट्याने बुधवारी रात्री शेतात बांधलेल्या गाईचा फडशा पाडल्यानंतर गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास शेतात काम करणार्‍या शेतकऱ्यावर हल्ला केला. यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. आशिष सुरळकर (वय 40, रा. धोबीवराड, ता. जळगाव) असे जखमी शेतकर्‍याचे नाव आहे.

सध्या खरीप हंगामासाठी शेतीकामांना शेतकर्‍यांनी वेग दिला आहे. दुपारी उन्हाचा कडाका असल्यामुळे सकाळपासूनच शेतीकामे केली जात आहेत. ती दुपारी बारापर्यंत आटोपत पुन्हा सायंकाळी कामे सुरू केली जातात. रोजप्रमाणे गुरुवारी सकाळी आशिष सुरळकर हे शेतात कामासाठी गेले होते. तेथून घरी पततत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, सावध होत सुरळकर यांनी बिबट्याशी झुंज दिली. बिबट्याला त्यांनी पूर्ण ताकदीने बाजूला फेकले. त्यातच त्यांच्या चेहर्‍यावर डाव्या बाजूला बिबट्याने पंजाने वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडओरड केल्याने परिसरात शेतीकामे करणार्‍या शेतकर्‍यांनी धाव घेतली. त्यांनी सुरळकर यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच, जिल्हा रुग्णालयात वनविभागाचे अधिकारी नितीन बोरकर यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेत जखमीकडून माहिती जाणून घेतली.

आणखी वाचा-“वर्दी काढून ये मग… ” मुस्लिम वृद्ध व्यक्तीची पोलिसांना धमकी; ‘हा’ Video व्हायरल होताच समोर आला खरा प्रकार

दरम्यान, बुधवारी रात्री लहू जाधव यांच्या शेतात बांधलेल्या गाईचाही बिबट्याने फडशा पाडला. महिनाभरापूर्वीही बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. घटनेमुळे धोबीवराड गाव आता दहशतीखाली असून, खरीप हंगामाची तयारी कशी करावी, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आहे. गाव परिसरात जंगल नसूनही बिबट्या कुठून आला, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Story img Loader