लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरी परिसरात फिरणाऱ्या केरळमधील काही अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केली असता आक्षेपार्ह काहीही आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

रविवारी केरळहून १० अल्पसंख्यांक विद्यार्थी त्र्यंबकेश्वर येथील भातखळा धर्मशाळेत दाखल झाले. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी काही अल्पसंख्यांक समाजाचे तरुण संशयितरित्या फिरत असल्याची तक्रार स्थानिकांनी पोलिसांकडे केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तरुणांची चौकशी करण्यात आली. या भागात गिरीभ्रमणासाठी आल्याचे तरुणांकडून पोलिसांना सांगण्यात आले.

आणखी वाचा-आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

दरम्यान, पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले यांनी, केरळमधील १० अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी ब्रह्मगिरीसह अन्य ठिकाणी छायाचित्रे काढल्याचे सांगितले. स्थानिकांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्र्यंबक पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या ओळखपत्रावरून माहिती घेण्यात आली. चौकशीत काहीही संशयास्पद न आढळल्याने त्यांना सोडून दिल्याचे देसले यांनी सांगितले.