लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडलगत मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याची भीती व्यक्त आहे. मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस जळगावहून वसईकडे निघाली होती.

या अपघातात प्रथमदर्शनी पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एसटी महामंडळाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात किती प्रवाशांचा मृत्यू झाला वा, किती जखमी झाले, याची स्पष्टता काही वेळात होईल, असे एसटी महामंडळाचे वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी सांगितले. वसई आगाराची ही बस होती. जळगावहून ती वसईला निघाली होती. सकाळी पावणेदहाच्या मालेगावहून ती नाशिककडे जात असताना हा अपघात झाला.

आणखी वाचा-नाशिक : उपनगर गोळीबार प्रकरणातील संशयितास पुण्यात अटक

चांदवडलगतच्या घाटात देवी मंदिराच्या पुढे उताराचा रस्ता आहे. तिथे एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than five passengers died in a bus accident near chandwad mrj
Show comments