नाशिक : मुसळधार पावसात जिल्ह्यातील लहान-मोठी सर्वच धरणे तुडूंब भरली असताना पांझण नदीवरील नागासाक्या हे एकमेव धरण मात्र त्यास अपवाद ठरले. नांदगाव तालुक्यातील हे धरण आजदेखील कोरडेच आहे. दोन ते तीन किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र आणि वरील भागातील (मनमाड) पावसावर ते क्वचितच भरते. तीन दशकांच्या इतिहासात एक-दोन वर्षाआड अपवादाने भरणारे नागासाक्या धरणाच्या बांधणीतून नेमके काय साध्य झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७४० मिलिमीटर (१०१ टक्के) पावसाची नोंद झाली. नांदगाव तालुक्यातही सरासरीच्या तुलनेत अधिक म्हणजे १४७ टक्के पाऊस झाला. ऑगस्टमधील दमदार पावसाने जिल्ह्यातील २३ धरणे पूर्ण क्षमतेने भरली वा, भरण्याच्या स्थितीत आहेत. धरण परिचालन सूचीनुसार मोठी धरणे या काळात पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरता येत नाही. अकस्मात येणारे पावसाचे पाणी (येवा) सामावण्यासाठी धरणात काहीअंशी जागा ठेवली जाते. त्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांमध्ये आठ ते १० टक्के कमी जलसाठा आहे. पूर नियंत्रणात त्याचा उपयोग होतो. मागील काही दिवसांत सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी सोडले जात आहे.

आणखी वाचा-Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?

गंगापूर, दारणा व पालखेड धरण समुहातून आजतागायत तब्बल ३६ हजार ११९ दशलक्ष घनफूट म्हणजे ३६.११ टीएमसीचा विसर्ग नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीकडे झाल्याची आकडेवारी आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये गुरुवारी ६० हजार ९८१ दशलक्ष घनफूट म्हणजे ९३ टक्के जलसाठा झाला. सर्वच धरणे तुडूंब असताना पांझण नदीवरील ३९७ दशलक्ष घनफूट क्षमतेचे नागासाक्या हे एकमात्र धरण अद्याप कोरडेठाक आहे. दरवर्षी त्याची यापेक्षा वेगळी स्थिती नसते.

साधारणत: तीन दशकांपूर्वी जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत या धरणाची बांधणी झाली होती. आजतागायत अपवादात्मक काळातच ते भरल्याचा इतिहास आहे, असे मालेगाव पाटबंधारे विभागातील अधिकारी सांगतात. पावसाळ्यात सलग तीन महिने कोरडे राहणारे हे धरण कधीकधी परतीच्या पावसात, अतिवृष्टीत अकस्मात भरल्याची उदाहरणे आहेत. अन्यथा सलग एक-दोन वर्षे ते कोरडेच राहते. पाच-सहा वर्षांपूर्वी पावसाळ्याच्या अखेरपर्यंत ते कोरडे होते. ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि चार-पाच दिवसांत ते काठोकाठ भरले, याकडे लक्ष वेधले जाते. म्हणजे मोसमी पावसाचा त्यास उपयोग होत नाही. परतीच्या पावसावर धरणाची संपूर्ण मदार असते. पांझण ही गिरणाची उपनदी. धरणाचे पाणलोट क्षेत्र आसपासचा दोन-तीन किलोमीटरचा परिसर. तेथील आणि वरच्या भागातील पावसाचे पाणी धरणात येते. त्या ठिकाणी पाऊस नसल्याने नागासाक्या कोरडे राहिल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी धुळ्यात मोर्चा

पाणी उपलब्धता प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह

कुठल्याही भागात धरण बांधण्यापूर्वी पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यवृष्टीचा अभ्यास होतो. त्याआधारे प्रस्तावित धरणात दरवर्षी किती जलसाठा होईल, याचे विश्लेषण केले जाते. पुरेसा जलसाठा होणार असल्यास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर नव्या धरणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जातो. नागासाक्याची बांधणी करताना पाणी उपलब्धततेच्या अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagasakya dam on panzhan river remains dry even in heavy rains mrj