नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी परिस्थिती स्पष्ट झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील मविआ उमेदवार शुभांगी पाटील असल्याचं जाहीर केलं. ते सोमवारी (१६ जानेवारी) एबीपी माझाशी बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, “जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये आम्ही महाविकासआघाडी म्हणून शुभांगी पाटील आमच्या उमेदवार आहेत.”
याआधी नाना पटोले म्हणाले होते, “अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला या माध्यमांनी चालवलेल्या बातम्या आहेत. आमचा अंतिम निर्णय होईल आणि सोमवारी (१६ जानेवारी) नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकासआघाडीचा उमेदवार जाहीर करू. नागपूरवरही चर्चा होणार आहे. दोन्ही उमेदवार महाविकासआघाडी म्हणून लढतील.”
“बेईमानी करून दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड”
“महाराष्ट्रातील पाचही जागी महाविकासआघाडी जिंकेल अशी स्थिती आहे. बेईमानी करून दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पदवीधरांच्या, शिक्षकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये लोक भाजपाला त्यांची जागा दाखवतील,” असं नाना पटोले यांनी म्हटलं.
हेही वाचा : काँग्रेसकडून निलंबनानंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला कारवाईबाबत…”
“भाजपानं सत्तेच्या जोरावर घरं फोडण्याचं पाप केलं”
“पैशांच्या भरवशावर, सत्तेच्या जोरावर घरं फोडण्याचं पाप भाजपाने केलं. त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील,” असा इशाराही नाना पटोलेंनी भाजपाला दिला.
दरम्यान, नाना पटोले यांनी नागपुरात बोलताना या बंडखोरीवर सडकून टीका केली. “डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपाचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोलेंनी व्यक्त केली होती.
हेही वाचा : नाशिक पदवीधर निवडणुकीतून धनंजय जाधवांची माघार, म्हणाले, “गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे…”
“नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने एबी फॉर्म दिला असना देखील डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तेथे अपक्ष म्हणून त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला. भाजपाने या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. इकडे सत्यजीत तांबे अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपाचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेले होते. हा धोका पक्ष विसरणार नाही आणि ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नाहीत. त्यांनाही कळते की दगाफटका करणाऱ्यांसोबत यशस्वी होणार नाही,” अशी टीका नाना पटोलेंनी केली होती.