नाशिक – ज्या दिवसापासून शरद पवार यांच्यापासून दूर झालो, त्यानंतर त्यांच्यासमोर जाण्याची हिंमत झालेली नाही. पवार यांच्यासमोर जाताना खूप प्रगल्भता असावी लागते, ती आपल्यात नाही, अशी प्रांजळपणे कबुली विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नरहरी झिरवळ यांनी माध्यमांकडे दिली.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे सर्वांचा ओढा असल्याच्या पार्श्वभूमीवर, झिरवळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे आदिवासी समाजाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात झिरवळ यांनी, आजपर्यंत मिळालेली सर्व पदे मायबाप जनतेमुळे मिळाले असून जनतेच्या सर्वांगीन विकासासाठी कटीबद्ध असून वेळ पडल्यास जनतेसाठी ठाम भूमिका घेऊन संघर्ष करण्यात येईल, असे सांगितले.

हेही वाचा >>>कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

अनेक दिवसांपासून १३ आदिवासी जिल्ह्यांत पेसा क्षेत्रातंर्गत १७ संवर्गातील पद भरती रखडली होती. सनदशीर मार्गाने हा विषय अनेकदा तडीस नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, यश न आल्याने शेवटी इतर आदिवासी लोकप्रतिनिधिंसह मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून जाळीवर उडी मारल्यानंतर शासनाला तातडीने १७ संवर्ग पेसा पद भरतीचा अध्यादेश काढावा लागला. त्यात काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून पद भरती सुरळीत केली जाणार असल्याचे झिरवळ यांनी सांगितले.

धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्याला आपण कायदेशीरपणे ठाम विरोध करणार असून समाजावर अन्याय होत असतांना समजासाठी लढणे हे आपले कर्तव्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.