नाशिक : भाजपने पहिल्या यादीत जिल्ह्यातील विद्यमान चार आमदारांना उमेदवारी जाहीर केली असली तरी नाशिक मध्य मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागेवरून भाजप-शिवसेनेत (एकनाथ शिंदे) रस्सीखेच सुरू आहे. सर्वेक्षणात भाजपसाठी ही जागा अनुकूल नसल्याने धोका पत्करण्याऐवजी ती शिंदे गटाला सोडण्याचा आग्रह धरला गेल्याचे पदाधिकारी सांगतात.

जिल्ह्यातील इतर विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असताना आपलेच नाव पहिल्या यादीत का डावलण्यात आले, हा नाशिक मध्य मतदारसंघातील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यापुढील प्रश्न आहे. एकसंघ शिवसेनेला गतवेळी जिल्ह्यात केवळ मालेगाव बाह्य आणि नांदगाव या दोन जागांवर तर, भाजपला नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, बागलाण आणि चांदवड-देवळा या पाच मतदारसंघात यश मिळाले होते. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) ताब्यात दिंडोरी, येवला, निफाड, देवळाली, सिन्नर आणि कळवण हे मतदारसंघ आहेत. अखेरच्या क्षणी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर स्वगृही परतल्याने ही संख्या सातवर पोहोचली. मित्रपक्षांच्या तुलनेत स्थानिक पातळीवर शिंदे गटाचे बळ तुलनेत बरेच कमी आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा…नाशिक पश्चिममधून दिनकर पाटील यांची बंडखोरी निश्चित

त्यामुळे मित्रपक्षांतील सध्याच्या अंतर्गत कलहात अधिकच्या जागा मिळविण्यासाठी शिंदे गटाने व्यूहरचना आखली आहे. मित्रपक्षाच्या जागेवर दावा सांगण्याचा जो पवित्रा लोकसभा निवडणुकीत भाजप व अजित पवार गटाने घेतला होता, त्याचे अनुकरण शिवसेना शिंदे गटाकडून होत आहे. ज्या पक्षाचा आमदार, त्याला ती जागा, असे सूत्र महायुतीने निश्चित केले असतानाही भाजप आणि अजित पवार गटाच्या जागांवर दावा सांगितला गेला आहे. तिकीट वाटपात भाजपच्या विद्यमान आमदारांना स्वकियांची दुषणे सहन करावी लागली. स्वकीय इच्छुकांचा दबाव झुगारत भाजपने नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, बागलाणमधून दिलीप बोरसे आणि चांदवड मतदारसंघात भावासाठी माघार घेत असल्याचे जाहीर करणारे डॉ. राहुल आहेर या चार विद्यमान आमदारांंना उमेदवारी जाहीर केली. परंतु, पहिल्या यादीत नाव न आल्याने आमदार फरांदे यांच्या गोटात नाराजी असून त्यांनी सोमवारी मुंबईत शक्तिप्रदर्शनही केले होते.

हेही वाचा… उदय सांगळे यांच्या हाती तुतारी, सिन्नरमध्ये माणिक कोकाटेंशी लढत

शिवसेना शिंदे गटाचा आग्रह

शिवसेना शिंदे गटाने नाशिक मध्यची जागा खेचण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मागे होता. विद्यमान आमदारांविषयीची नाराजी त्यास कारक ठरली. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपच्या ताब्यातील ही जागा शिंदे गटाला मिळायलाच हवी, हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी सांगितले.