नाशिक : पावसाळ्यात डोंगर, धबधबे, गडकिल्ले, घाट, धरण, तलाव परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित पर्यटन स्थळाची क्षमता लक्षात घेऊन गर्दी नियंत्रित करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने पर्यटक परवाना देण्याची संकल्पना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मांडली आहे. प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्वावर हे पर्यटक परवाने देण्यात यावेत, असेही त्यांनी सूचित केले आहे.

मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. अशा ठिकाणी गर्दी नियंत्रण व संभाव्य अपघातांच्या घटना टाळण्यासाठी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी संबंधित यंत्रणांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केली. जी पर्यटन स्थळे, ज्या विभागाच्या अखत्यारीत आहे, त्यांच्यावर ही जबाबदारी राहील. वन विभाग, पाटबंधारे विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणांची पर्यटकांच्या गर्दीनुसार अ, ब आणि क अशा तीन प्रकारात वर्गवारी करावी. गड-किल्ल्यांवर, धरण, तलाव, धबधबे आदी ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची नोंद घेण्यात येऊन, सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याची खात्री संबंधित विभागांना करावी लागणार आहे.

हेही वाचा…नाशिक : ‘भूमी अभिलेख’चा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, ३५ हजारांची लाच घेताना प्रभारी भूकरमापक जाळ्यात

‘अ’ दर्जाच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अशा ठिकाणांची धारण क्षमता निर्धारीत करावी. यासाठी अनुभवी दुर्ग व पर्यावरण अभ्यासकांची मदत घ्यावी. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांकडून माहिती मागवून त्यांच्या अनुभवाचाही वापर करून विशिष्ट पर्यटनस्थळी किती गर्दी सामावू शकते, याची माहिती घ्यावी आणि त्यानुसार उपाय करण्यास सांगण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी किती जण सामावले जाऊ शकतात, हे लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणासाठी ऑनलाईन पद्धतीने पर्यटक परवाना देण्याची सूचना शर्मा यांनी केली आहे.

पोलिसांनी सुट्टीच्या दिवशी पर्यटन स्थळांवर, येण्या-जाण्याच्या मार्गावर व मोक्याच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा. तसेच पोलीस, वन व पाटबंधारे विभागाने आपल्या हद्दीतील जीवरक्षक, सर्पमित्र, स्वयंसेवक व आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचाव कार्यासाठी मदत करणाऱ्यांची यादी तयार करावी. त्यांची बैठक घ्यावी. गरजेनुसार त्यांची मदत घेता येईल. त्यांना आपत्कालीन स्थिती हाताळण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करावे, असे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा…दिवसाआड परीक्षा घेण्याविषयी आरोग्य विद्यापीठाची सहमती

धोकादायक ठिकाणी सेल्फीला प्रतिबंध

वन विभागाने ज्या ठिकाणी पर्यटनाची सुविधा निर्माण केली आहे, त्याची माहिती उपलब्ध करून द्यावी. अशा ठिकाणी आवश्यकता असल्यास प्रशिक्षित लोकांच्या मदतीनेच पर्यटकांना प्रवेश द्यावा. वनक्षेत्र, गड-किल्ले, धरण परिसरात नागरिकांनी शिस्त पाळणे, वनांचे नुकसान टाळणे तसेच अवघड ठिकाणी सुरक्षेची काळजी घ्यावी. धोकादायक ठिकाणी सेल्फी, छायाचित्रे काढू नयेत, याबाबतची माहिती सूचना फलकांच्या माध्यमातून आपत्कालिन संपर्क क्रमांकासह प्रसारित करावी, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.