नाशिक : काही मंडळे विशाल आकाराची दोन ढोल-ताशा पथके सहभागी करतात. त्यामुळे मिरवणूक संथपणे पुढे सरकते. मागील मंडळे अडकून पडतात. आवाजाच्या भिंती उभारण्यास परवानगी दिल्यास मिरवणुकीतील संथपणा दूर करता येईल. तसेच प्रत्येक गणेश मंडळास केवळ एकच ढोल पथक सहभागी करण्यास परवानगी द्यावी आणि अखेरच्या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत मिरवणूक सुरू ठेवावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पोलिसांनी ध्वनि प्रदूषणाबाबत न्यायालयीन निर्णयाचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. सजावट आणि देखाव्यातून धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना गणेश मंडळांना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय परिसरातील सभागृहात गणेश मंडळ आणि शांतता समिती सदस्यांची बैठक आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे प्रमुख समीर शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी विविध गणेश मंडळांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मनपा, महावितरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार फरांदे यांनी सर्व शासकीय यंत्रणांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून गणेशोत्सव शांततेत होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

हेही वाचा : नाशिक: सारं काही पाण्यासाठी; धरण परिसरातील वीज पुरवठा खंडित

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या भिंती उभारण्यास परवानगी देण्याची मागणी केली. ढोल पथकांची पुण्यात शांतपणे स्वतंत्र मिरवणूक असते. सामूहिक मिरवणुकीत ढोल पथकांच्या सहभागावर शेलार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका ढोल पथकात १००-१५० वादक असतात. काही मंडळे अशी दोन पथके सहभागी करतात. त्यामुळे मिरवणूक संथ होऊन मागील गणेश मंडळे तिष्ठत राहतात. आवाजाच्या भिंतींना परवानगी दिल्यास मिरवणूक जलदपणे पुढे जाईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बैठकीत मंडळांनी काही अडचणी मांडल्या. तक्रारींची सोडवणूक करण्याचे आयुक्तांनी मान्य केले. गणेशोत्सवात मनपा आणि अन्य विभागांकडून केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी, २५० जादा बस सेवेत, तिसऱ्या श्रावणी सोमवारचे नियोजन

धोकादायक वीज तारा, अतिक्रमणे हटवा

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी वीज तारा लोंबळकतात. धोकादायक ठरणाऱ्या तारा काढण्याची गरज आहे. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याकडे लक्ष वेधण्यात आले. एक खिडकी योजना कार्यान्वित झाल्यास मंडळांना अर्ज सादर करणे व परवानगी मिळविणे सुलभ होईल. नोंदणीकृत मंडळांना बंदोबस्त द्यावा. अनेक रस्त्यांवर पडलेले पाइप व तत्सम वस्तू हटवाव्या लागतील. रात्री फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

हेही वाचा : मुख्यमंत्री नऊ सप्टेंबरला पाचोऱ्यात, शासन आपल्या दारी तालुका उपक्रम

नियमावलीचे पालन करा

गणेश मंडळांनी मंडप उभारणीवेळी वाहतुकीला अडथळा व कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या निर्णयांचे पालन करून मंडळांनी गणेशोत्सव स्पर्धेत बक्षीस मिळविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले. मंडळांनी मूर्तीला परिधान केलेल्या दागिन्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. तसेच गणेशोत्सवातील सजावट आणि दाखविल्या जाणाऱ्या चित्रफितींमुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. शासकीय यंत्रणांच्या अटी व शर्तींचे मंडळांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik commissioner of police held meeting with members of ganesh mandals for ganeshotsav 2023 mla devyani farande css