नाशिक : वीज कंपनीच्या कार्यालयात या, घरी बसून अडचणी सांगू नका, अशी दरडावणी, तसेच दुरुस्तीसाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्याकडून दुरुस्तीकामी लागणारी सामग्री मागून उद्योजकाला भंडावून सोडणे, अशी विविध उदाहरणे मांडत निमा कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर उद्योजकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत विजेच्या लपंडावामुळे उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत आहे. उद्योजकांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारत महावितरणचे कार्यकारी अभियंते चेतन वाडे यांनी दिलगिरी व्यक्त केली. उद्योजकांच्या समस्यांमध्ये प्राधान्याने लक्ष घालून १५ दिवसांत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. औद्योगिक क्षेत्रातील वीज समस्यांच्या पार्श्वभूमीवर, महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत निमा कार्यालयात तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकारी अभियंता वाडे यांच्यासमोर उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांनी सारेच अवाक झाले.

हेही वाचा…उगाच विरोधकांवर खापर फोडू नका; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला इशारा

सातपूर औद्योगिक वसाहतीतील सी-१०, सी -११ तसेच भूखंड क्रमांक २८ या ठिकाणी सातत्याने ट्रीपिंग होते. त्यामुळे उद्योग बंद ठेवावा लागतो. महावितरण कार्यालयात फोन केला असता कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तरे मिळतात. १० दिवसांपूर्वी या परिसरात वीज गेली असता तुम्ही कार्यालयात या, घरी बसून अडचणी सांगू नका, असे उत्तर मिळाल्याचे सतीश पगार या उद्योजकाने सांगितले. एकदा रात्री वीज गेली आणि महावितरणशी संपर्क साधल्यावर कर्मचारी आले, पण तुमच्याकडे फ्युज वायर आहे का, अमूक साहित्य आहे का, असे विचारून आम्हाला भंडावून सोडले. आम्ही धावाधाव करून हे साहित्य उपलब्ध करून देतो. परंतु, आम्हाला खूप मनस्ताप होतो, असे नितीन खंडेलवाल आणि एम. एस. तोडवाल यांनी सांगितले.

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनीही उद्योजकांच्या भावना तीव्र असल्याचे सांगत महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढले. वीज कंपनीच्या कारभारामुळे उद्योगक्षेत्र मोडकळीस येत असेल तर ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल. सर्व बाबींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. उपअभियंता ऋषिकेश जोगळेकर यांनाही धारेवर धरण्यात आले. निमाचे उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे, रवींद्र झोपे, रावसाहेब रकिबे यांनीही प्रश्नांची सरबती केली.

हेही वाचा…नाशिक : नाल्यामुळे हर्षवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

सातपूरमधील उद्योजकांनी ज्या काही समस्या मांडल्या, त्यातील बहुसंख्य समस्यांबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगून महावितरणच्या कर्मचारी वर्गामुळे उद्योजकांना जो काही त्रास झाला, त्याबद्दल कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी बैठकीत दिलगिरी व्यक्त केली. या प्रश्नात स्वत: लक्ष देत पंधरा दिवसांत उद्योजकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.