नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी परिसरात पावसामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अवघड झाले आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नाला ओलांडावा लागत असून नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी गावपाड्यांचा संपर्क तुटत आहे. यापैकी एक हर्षवाडी गाव. हरिहर किल्ला पायथ्याशी असणारी ही ४० पेक्षा अधिक घरे असलेली वाडी आहे. या वाडी परिसरातून एक नाला जातो. यामुळे वाडीचे दोन भाग झाले आहेत. या भागात जिल्हा परिषदेची शाळा आहे. वाडीतील विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. दोन दिवसांपासून नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याने दुसऱ्या भागाशी असलेला संपर्क तुटला आहे. दोन दिवसांपासून शाळा बंद आहे. शिक्षकही येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

हेही वाचा – नाशिक : गंगापूर धरण निम्मे भरण्याच्या स्थितीत; भावली तुडुंब, दारणा, नांदुरमध्यमेश्वरमधून विसर्ग

दरम्यान, मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने बांधलेल्या सभागृहात बुधवारी स्थानिकांकडून शाळा भरविण्यात आली. हरिहर किल्लाच्या पायथ्याशी ही वस्ती आहे. किल्ला पर्यटनासाठी पर्यटन विकास महामंडळ कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा होतो. असाच दावा वनविभागाकडून विकास कामे केल्याच्या नावाखाली होतो. परंतु, हा निधी खर्च होऊनही स्थानिकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा – महायुतीतील खदखद चव्हाट्यावर, अजित पवार गटाच्या आमदाराची मंत्र्यांवर टीका

जाणीवपूर्वक दुर्लक्ष

हर्षवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. मुलांनाही जीव मुठीत धरून जावे लागते. शाळेचा रस्ता तयार करावा, अशी मागणी सातत्याने करत आहोत. मात्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. – भगवान मधे (एल्गार कष्टकरी संघटना)