नाशिक : कांद्यावरील निर्यात बंदी, साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणि बांगलादेशकडून भारतीय द्राक्षांवर लावलेले भरमसाठ आयात शुल्क यामुळे शेतकऱ्यांवर झालेले विपरित परिणाम कथन करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यकर्ते या प्रश्नांकडे न्यायाने बघत नसतील तर आपल्याला सामूहिक शक्ती दाखवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. संसद अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात येतील.

केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे सोमवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड येथे आयोजित रास्ता रोकोत पवार हे  सहभागी झाले.  शेतकरी दोन पैसे मिळतील म्हणून कांद्यासाठी कष्ट  करतात. पण, दुर्दैवाने देशाचे धोरण ठरवणाऱ्या भाजप सरकारला त्यांच्या कष्टाला किंमत देण्याची भावना नाही. सरकारचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा असून आजच्या आंदोलनामुळे दिल्लीतील राज्यकर्त्यांची झोप उडणार आहे. चांदवडला सर्व लोक रस्त्यावर उतरून शक्ती दाखविणार असल्याचे समजल्यावर भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्या. या निर्णयााचा फेरविचार होईल. असे सांगितले जाऊ लागले. आधी जेव्हा निर्णय घेतला, तेव्हा यांना आठवण आली नाही, अशी टीका पवार यांनी केली. 

हेही वाचा >>> स्मार्ट प्रीपेड’ वीज मीटर विरोधात मालेगावात आंदोलन

शेतकरी संकटात असताना मदत करण्याऐवजी भाजप सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. नाशिकची द्राक्षे बांगलादेशात जातात. त्या देशाने द्राक्षांवर १६० रुपयांचे आयात शुल्क लागू केले. एवढासा देश आमच्यावर कर बसवतो आणि आमचे सरकार बघत नाही. असेच कर लागू केले गेल्यास शेतकरी वाचू शकणार नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीवर घातलेल्या बंदीमुळे आणखी अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कांदा लिलाव पूर्ववत : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर तीन दिवसांनी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत झाले. पण, उन्हाळ आणि लाल कांद्याच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली. गुरुवारी लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी ३३६० तर उन्हाळ कांद्याला ३६०० रुपये दर मिळाले होते. सोमवारी तेच दर लाल कांद्याचे २२६० तर, उन्हाळ कांद्याचे २४६० रुपयांपर्यंत खाली आले.

Story img Loader