नाशिक – मालेगावचे माजी महापौर तथा एमआयएमचे महानगर प्रमुख अब्दुल मालिक यांच्यावर झालेला गोळीबार हा मालमत्ता वादातून झालेला नसून ताे राजकीय षडयंत्राचा भाग आहे. मालेगावमध्ये जे झाले ते चार जून रोजी निकाल लागल्यानंतर सर्वत्र होऊ शकते, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
खासदार जलील हे गुरुवारी नाशिक येथे आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मालमत्तेच्या वादातून मालेगावातील प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. हा गोळीबार मालमत्तेच्या वादातून झालेला नाही तर राजकीय षडयंत्राचा भाग आहे. यामागे कोणाचा हात आहे हे लवकरच स्पष्ट होईल. जर मालमत्तेच्या वादातून हा प्रकार झाला असेल तर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. सत्ता मिळवायची असेल तर साम, दाम, दंड आणि बंदुकचा वापर करा असाच संदेश या माध्यमातून जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून नजरचुकीने कृती झाली आहे. मात्र त्याचे राजकीय भांडवल केले जात आहे. भाजपने मराठी लोकांना फोडण्याचे काम केले. त्यांच्या या वागण्याचा काय परिणाम झाला, हे निकालातून स्पष्ट होईल, महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवेल. सध्या शिक्षणात राजकारण आणले जात आहे. त्याला सर्व राजकीय पक्षांकडून विरोध होणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे जलील यांनी स्पष्ट केले.
© The Indian Express (P) Ltd