नाशिक – स्वच्छतेमुळे अनेक गावांचा कायापालट होऊन गावे आदर्श झाली आहेत. स्वच्छता अभियानामुळे देशातील लाखो बालकांचे प्राण वाचले असल्याचा अहवाल आहे. त्यामुळे सर्व गावांनी परदेशातील गावांप्रमाणे स्वच्छ, सुंदर व आदर्श गाव होण्यासाठी लोकसहभागातून एकत्र येण्याचे आवाहन विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात झाला. यावेळी गेडाम यांनी मार्गदर्शन केले.

खासदार भास्कर भगरे यांनी, स्वच्छता अभियानामुळे गावांचा कायापालट होत असून आपण स्वत: सरपंच असताना या अभियानात काम केले असल्याचा अनुभव मांडला. स्वच्छता अभियानातून गावाला विकासाची दिशा प्राप्त होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी, दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे अतिशय महत्व असून स्वच्छता अभियान ही लोकचळवळ स्वरुपात गावात राबविण्याचे आवाहन केले.

हेही वाचा >>>शासकीय योजनांची महिलांना उन्नतीसाठी मदत; मेळाव्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा विश्वास

प्रास्ताविकात पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी, संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासह स्वच्छता अभियानांची माहिती दिली. यावेळी पुरस्कारप्राप्त गावांमधील बारागाव पिंप्रीच्या सरपंच संध्या कटके, दहिंदुलेच्या ग्रामपंचायत अधिकारी डॉ. स्वाती देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीद्र परदेशी हेही उपस्थित होते.

हेही वाचा >>>नंदुरबार जिल्ह्यास पुन्हा भूकंपाचे धक्के

२०१८ पासूनच्या सर्व पुरस्कारप्राप्त ३० ग्रामपंचायतींना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. तसेच ग्रामस्तरावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सिमा पेठकर यांनी केले.

२०२३-२४ चे पुरस्कार अनोख्या पध्दतीने जाहीर

या सोहळ्यात २०२३-२४ मधील पुरस्कारांची अनोख्या पद्धतीने घोषणा करण्यात आली. अस्वच्छ फलकावरील धूळ झाडूने स्वच्छ करण्यात आल्यानंतर पुरस्कारप्राप्त गावांची नावे उपस्थितांना दिसली. त्यात मालेगाव तालुक्यातील डाबली ग्रामपंचायतीने प्रथम, बागलाण तालुक्यातील लाडूद ग्रामपंचायतीने व्दितीय तर निफाड तालुक्यातील उंबरखेड ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला.