नाशिक जिल्हा परिषदेच्या भगिरथ प्रयास उपक्रमात २०० गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करून ही गावे टँकरमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यात चांगले काम करणाऱ्या गावाला जिल्हा नियोजन समितीतून १० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी घोषित केले. जलसंधारणाची कामे खडकांचे उभे छेद असणाऱ्या भागात झाल्यास भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल. खडकांचे आडवे छेद असणाऱ्या भागात तुलनेत कमी यश मिळेल. त्यामुळे जमिनीत खडकांचे उभे छेद असणारी ठिकाणे शोधून अधिक्याने काम करण्याचा सल्ला जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला.

हेही वाचा- “पूर्वसूचनेशिवाय शेतीचा वीज पुरवठा खंडित करू नका”; दादा भुसे यांचे निर्देश

जिल्हा परिषदेच्या भगिरथ प्रयास उपक्रमास पालकमंत्री भुसे, जलतज्ज्ञ सिंह, विधानसभेचे उपसभापती नरहळी झिरवाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदींच्या उपस्थितीत सुरूवात झाली. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपरोक्त गावांचे सरपंच उपस्थित होते. या उपक्रमात २०० गावांमध्ये जलसंधारणाची ७०५ कामे करण्याचे निश्चित झाले आहेत. गावातील नद्या, नाल्यांवर बांध बांधले जातील. जुन्या बंधाऱ्यांतील गाळ काढणे त्यांची डागडुुजी करून मजबुतीकरण अशी कामे करण्यात येणार आहेत. मर्यादित गावात व्यापक कामे करून ही गावे टँकरमुक्त करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा- जळगाव जिल्ह्यातील ३३० शाळांचे सोमवारपासून शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन

सादरीकरणानंतर जलतज्ज्ञ डाॅ. सिंह यांनी नियमित बांध बंदिस्तीची कामे केली जातील हे ठीक असले तरी ती अशा ठिकाणी करणे आवश्यक आहे की भूजल पातळी वाढण्यास त्याचा उपयोग होईल, असे सांगितले. जमिनीतील खडकात उभे छेद असलेल्या भागात ही कामे झाल्यास भूजल पातळी चांगल्याप्रकारे वाढेल. अशी ठिकाणे वगळून कामे केल्यास अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारचे पैसे वाया जाऊ नये म्हणून हा सल्ला आपण देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उपरोक्त गावांमध्ये अशी ठिकाणे शोधून तिथे अधिक्याने काम करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा- मालेगावात ‘वॉटर ग्रेस’विरुद्ध गुन्हा; कचरा संकलनात फसवणूक

पालकमंत्री भुसे यांनी सरपंचांसाठी हा अतिशय महत्वाचा विषय असल्याचे नमूद केले. या उपक्रमात चांगले काम करणाऱ्या गावाला १० लाखाचा अतिरिक्त निधी दिला जाईल. सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे. त्याचे चांगले फळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात शिवसेना-भाजप सरकार अतिशय प्रभावीपणे काम करीत आहे. ग्रामीण भागात १०० आदर्श शाळांची उभारणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.