जळगाव : शहरालगतच्या आसोदा-मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यातून बैलगाडी काढत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी बुडू लागल्याचे पाहून बैलांना वाचविण्यासाठी शेतकऱ्याने त्यांच्या दोर्‍या सोडल्या. बैल बाहेर आले. परंतु, पोहता येत नसल्याने शेतकर्‍याचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली.

जळगाव शहरापासून सात ते आठ किलोमीटरवरील आसोदा गावात सुकलाल माळी (६३) हे पत्नी, मुलगा आणि सून यांच्याबरोबर वास्तव्याला होते. शेतीची काम करून ते उदरनिर्वाह करीत होते. जळगाव जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पहाटेपर्यंत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मंगळवारी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सुकलाल माळी हे बैलगाडीने मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात जाण्यासाठी निघाले. रस्त्यावर रेल्वेचा बोगदा आहे. पावसामुळे या बोगद्यात पाणी साचले होते. त्यावेळी पलीकडे जाण्यासाठी माळी यांनी बैलगाडी बोगद्याखाली साचलेल्या पाण्यातून टाकली. पावसामुळे बोगद्यात पाणीच पाणी साचले होते. त्यात माळी यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह ते पाण्यात बुडाले. त्यावेळी त्यांनी दोन्ही बैलांची सुटका करण्यासाठी बैलगाडीची जोत तोडली. भेदरलेले बैल झटका देऊन बाहेर आले. मात्र, माळी यांना पोहता येत नसल्याने ते बुडाले.

हेही वाचा – नाशिक: समाजमाध्यमातील द्वेषयुक्त चित्रफितींविरुध्द कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हे

हेही वाचा – नाशिक: शासकीय योजनांची केंद्रीय समितीकडून पाहणी

ही घटना शेजारी शेतात काम करणार्‍या शेतमजुरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी माळी यांना बाहेर काढून खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.