जळगाव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेनिमित्त मंगळवारी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगावमध्ये येत आहेत. तत्पूर्वीच धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील महामार्गावर लावलेला त्यांच्या स्वागताचा फलक गायब झाला आहे. त्यासंदर्भात ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पाळधी येथील पोलीस दूरक्षेत्रात तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान, यापूर्वीही शिवसंवाद यात्रेदरम्यान स्वागताचे पाच-सहा फलक फाडण्यात आल्याची घटना या मतदारसंघात घडली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेनिमित्त धरणगावमध्ये येत असल्याने जळगाव ग्रामीण मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचारफलक लावण्यात आले होते. पाळधीजवळील महामार्गावर लावलेला स्वागतफलक रात्रीतून गायब झाला आहे.  सहसंपर्कप्रमुख वाघ व युवासेना जिल्हाप्रमुख चौधरी यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

हेही वाचा >>>दिवाळीनंतर कांदा दरात ७०० रुपयांची उसळी; क्विंटलला अडीच हजाराचा भाव

वाघ म्हणाले की, नेत्या सुषमा अंधारे यांच्या स्वागतासाठी पाळधी गावाजवळ लावलेला फलकच गायब झालेला आहे. त्याबाबत आम्ही पाळधी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार अर्ज दाखल केला आहे. यात्रेसंदर्भातील प्रचारफलक गायब करणे चुकीचे असून, यातून समोरची मंडळी धास्तवाली असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुषमा अंधारे यांची जाहीर सभा धरणगावमध्ये ठेवण्यात आली आहे. त्यांच्या सभेच्या निमित्ताने जळगाव ग्रमीण मतदारसंघात फलक लावण्यात आले आहेत. त्याप्रमाणे पाळधीजवळील महामार्गावरही फलक लावला. मात्र, रात्रीतून तो  अचानक तेथून गायब झाला. म्हणजे चोरण्यात आला आणि त्यासंदर्भात माहिती मिळताच आम्ही पोलीस दूरक्षेत्रात आलो. तेथे तक्रार अर्ज दिला. जो कोणीही असेल राजकीय असेल, अराजकीय असेल, लहान असेल, मोठा नेता असेल, त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. या फलकावरून कोणाचेही असो, कोणत्याही पक्षाचे असो, यावरून मोठी घटना होण्याचा, वादविवाद होण्याचा संभव असेल, त्याबाबतची पोलीस प्रशासनाने दखल घेतली पाहिजे अथवा चौकशी केली पाहिजे, जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. अशी आमची मागणी आहे.

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. यातूनच हा प्रकार घडला असावा. सुषमा अंधारे या महाराष्ट्रामध्ये जाहीर सभांतून भाषण करताहेत, त्या कशाप्रकारे लोकांचे प्रबोधन करताहेत, अंधारेंच्या प्रखर विचारांमुळे काहींना पोटशूळ झालाय. त्या कडाडून टीका करीत असतात. यातूनच हा प्रकार घडला असावा, सुषमा अंधारे यांचे फलक तुम्ही फाडू शकतात, त्यांचे विचार कसे नष्ट करणार? असाही घणाघात वाघ यांनी केला.

हेही वाचा >>>नाशिक शहरात १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी म्हणाले की, पाळधी गावाच्या बाहेरच्या माहमार्गाजवळ महाप्रबोधन यात्रेचा फलक लावला होता. मात्र, तोच रात्रीतून चोरी गेला. पाळधीहून एका कार्यकर्त्याचा फोन आला. गावातून फलक चोरीला गेल्याचे त्याने सांगितले. आम्ही सर्व पदाधिकारी तेथे पोहोचलो. तेथे असलेल्या केळी वेफरच्या विक्रेत्याच्या गाडीच्या खांबांना हा फलक लावला होता. त्याचेही नुकसान केले आहे. त्याने दोन दिवस उन्हात व्यवसाय केला, मलाही महाप्रबोधनही ऐकायला यायचे आहे, असेही फलक लावताना विक्रेत्याने सांगितले होते. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण हे अतिशय चुकीचे आहे. युवासेनाप्रमुख  आदित्य ठाकरे हेही शिवसंवाद यात्रेनिमित्त आले होते, त्यावेळीही त्यांच्या स्वागताचे फलक तोडण्यात आले होते. आमच्या छातीत वार करा, पाठीवर करू नका, हे तर एखाद्या मनोरुग्णाचेच काम आहे, अशी टीकाही चौधरींनी केली. दरम्यान, पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा यांनी सांगितले की, सीसीटीव्हीसह अन्य बाबींच्या मदतीने पुढील तपास करणार आहे. भागवत चौधरी यांच्यासोबत गुलाबराव वाघ, दिलीप चौधरी व इतर कार्यकर्ते यांनी तक्रार अर्ज दिला असून, तो घेतला आहे. सखोल तपास करून कारवाई करणार आहोत. फलकासाठीच्या परवानगीसह अन्य बाबी तपासून पाहणार आहोत. फलक लावताना कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group complaint in police about sushma andhare hoarding in gulabrao patil s constituency disappeared zws