लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासंदर्भात शांततेत आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार करीत गोळीबार, अश्रुधुराचा वापर केला. सर्वकाही शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांना लाठीमार करण्याचा आदेश कोणी दिला, अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या, असे प्रश्न राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले. महिला, मुलांवरही लाठीमार केल्याची ही घटना निंदनीय असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

शहरातील आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात शनिवारी आमदार पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, पालघरचे आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी आदी उपस्थित होते. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी पोलीस अधीक्षकही उपस्थित नव्हते.

हेही वाचा… सर्व अंगणवाड्यांना आता इमारत; १७ हजार पदांची भरती; पोषण माह राज्यस्तरीय अभियानाचे उदघाटन

पोलिसांकडूनच अगोदर कारवाई झाली. लाठीमार करण्यापूर्वी गृह मंत्रालयाकडून आदेश व्हावा लागतो. या घटनेसंदर्भात सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहनही आमदार पवार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीची धास्ती घेतली आहे. आता पंतप्रधान मोदींना आगामी निवडणूक जिंकणे कठीण होणार आहे. भाजपकडून मराठा व धनगर आरक्षणावर राजकारण सुरू आहे.

हेही वाचा… जादा परताव्याच्या आमिषाने सहा लाखांना गंडा

संसदेतच आरक्षणावर निर्णय होऊ शकतो. मात्र, भाजपचे खासदार आरक्षणावर का बोलत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी राज्यातील सध्याची परिस्थिती बघता दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असतानाही जळगावकरांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागते, याबद्दल त्यांनी आश्र्चर्य व्यक्त केले

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who ordered lathicharge in jalna question by rohit pawar dvr