नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी

पनवेल/ नवी मुंबई/ उरण : मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने अखेर गुरुवारी विमानतळ प्रकल्पग्रस्त कृती समितीने मानवी साखळी करीत विमानतळाला फक्त दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे अशी आग्रही मागणी केली. या आंदोलनाला भाजप, मनसे व आरपीआय या पक्षांनी पाठिंबा दिला होता. दिघा ते बेलापूर, पनवेल ते बेलापूर व उरण ते जासई असे तीन टप्प्यांत हे आंदोलन झाले.

या आंदोलनाला प्रकल्पग्रस्तांनी उत्फूर्त पाठिंबा दिल्याचे दिसून आले. करोनाच्या पार्श्वभूमी वर सामाजिक अंतर राखत वाहतुकीस अडथळा न करता शीव-पनवेल व ठाणे बेलापूर महामार्गावर मानवी साखळी यशस्वी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. करोनामुळे जमावबंदी आदेश असल्याने पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतरही हे आंदोलन करण्यात आले. दोन आठवडे या आंदोलनासाठी प्रकल्पग्रस्तांची एकजूट करण्यासाठी बैठका सुरू होत्या. आता नाही तर भविष्यात कधीच नाही.अशा भावना यावेळी आंदोलक व्यक्त करीत होते.

नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबतचा ठराव सिडकोच्या संचालक मंडळाने १७ एप्रिल रोजी मंजूर के ला आहे. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देत तो के ंद्राला पाठविला जाणार आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिकांची मागणी आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. कल्याण-शिळफाटा रस्ता येथे आगरी युथ फोरम, संघर्ष समिती, आगरी ज्ञातीमधील सामाजिक संघटनांनी मानवी साखळी आयोजित केली होती.

पनवेल ते बेलापूर

पनवेल ते बेलापूर या दहा किलोमीटरच्या साखळीसाठी सकाळी नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्ते जमा झाले होते. दहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. ‘एकच निर्धार, विमानतळाला ‘दि. बां’चेच नाव’ अशा आशयाच्या फलकांनी महामार्गावरील मानवी साखळी प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होती. सव्वाअकरा वाजल्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने अर्धा तास आंदोलकांनी छत्रीचा आधार घेतला. आंदोलन १२ वाजता संपले.  आंदोलनकांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना पाण्याच्या बाटल्या, गरम चहा, समोसा, वडापाव, शाकाहारी बिर्याणी देण्यात येत होती. कळंबोली सर्कलसारखा वाहनांची वर्दळ असणाऱ्या परिसरातही मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी आगरी समाज एकवटल्याचे चित्र होते. तरुणांप्रमाणे भाजप नेत्यांचा आदेश असल्याने अनेक महिला कार्यकर्त्यां आंदोलनात दिसत होत्या. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आवाहन केल्यानंतरही प्रकल्पग्रस्त तरुण या

आंदोलनात दि. बा. पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईसाठी सहभागी झाले होते. शेकापने आघाडीधर्म पाळण्याचे जाहीर केल्यानंतरही शेकापचे खारघर येथील माजी स्वीकृत नगरसेवक गुरुनाथ गायकर हे आंदोलनात सहभागी झाले होते. आता नाही तर भविष्यात कधीच नाही अशी भावना आंदोलकांमध्ये होती. हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे.

उरण ते जासई

उरण ते जासई अशी १३ किलोमीटर मानवी साखळी स्थानिक भूमिपुत्र व येथील ग्रामस्थांनी बनविली होती. यामध्ये उरण शहर, बोकडविरा, फुंडे, जेएनपीटी कामगार वसाहत, नवघर, करळ फाटा, दास्तान व जासई या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात स्थानिक भूमिपुत्रांनी सहभाग घेतला होता. ही साखळी जी. एल. पाटील पुतळा ते उरणच्या १९८४ च्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्याचे स्मारक असलेल्या जासईपर्यंत करण्यात आली. या आंदोलनात येथील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. उरणमधील आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी तसेच कॉम्रेड भूषण पाटील यांनी केले. आंदोलनात पाऊस असूनही महिलाही सहभागी झाल्या होत्या. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

दिघा ते बेलापूर

नवी मुंबईतील आंदोलकांनी दिघा ते बेलापूर या पट्टय़ात ठिकठिकाणी मानवी साखळी करीत विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी केली. घणसोली, जुईनगर, शिरवणे या भागात युवक आणि महिलांचा मोठा सहभाग होता. दिघा ते बेलापूर येथे मुख्य रस्त्यावर पारंपरिक वेशभूषा परिधान करून आंदोलक मानवी साखळीत सहभागी होत सरकारचा निषेध करीत होते. ११ वाजता सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यकर्ते जमा झाले होते. सुमारे तीन तास निषेधाचे फलक हाती घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, विधान परिषद आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, राजेश पाटील आदी नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. विमानतळ धावपट्टीवर दि. बा. पाटील यांची आद्याक्षरे रचून मानवी साखळी बनवण्यात आली होती.

‘धावपट्टी’वरही मानवी साखळी

मानवी साखळी आंदोलनात आंदोलकांनी कोलीकोपर गावातील दत्त मंदिरासमोर  विमानतळासाठी  सपाटीकरणावरही दि. बा. पाटील या अक्षरांवर मानवी साखळी करण्यात आली. यात सुमारे सातशे आंदोलकांनी सहभाग घेतला. राष्ट्रगीताने या मानवी साखळीची सुरुवात करण्यात आली. ड्रोन कॅमेऱ्यामधून या सर्व मानवी साखळीचे छायाचित्रण करण्यात आले.

दि. बा. पाटील यांच्यासाठी विशेष गीतरचना करीत ध्वनिफीतही बनविण्यात आली होती. पनवेल व उरण येथील सर्वच मानवी साखळीमध्ये आगरी समाजातील वयोवृद्ध, तरुण व बालक अशा तीनही पिढय़ा सहभागी झाल्या होत्या.