कळंबोली येथून एकत्र मुंबईत निघणार

पनवेल : धनगर आरक्षणासाठी १ मार्च रोजी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असून राज्यभरातून धनगर समाज एकवटू लागला आहे. बुधवारी पनवेल, कामोठे, कळंबोली परिसरात शेळ्या-मेंढय़ांसह हा समाज मोठय़ा संख्येने दाखल झाला असून कळंबोली येथून एकत्र मुंबईकडे कूच करणार आहे.

धनगर आणि धनगड हे दोन शब्द एकच असल्याचे शासनाने मान्य केले असतानाही या समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे हा समाज गेल्या अनेक वर्षांपासून सुविधांपासून वंचित आहेत. भाजप सत्तेवर आल्यावर धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. त्यामुळे हा समाज आता संतप्त झाला आहे. त्यामुळे समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली १ मार्च रोजी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, विकास महात्मे यांच्यासह धनगर समाजाचे आमदार उपस्थित राहणार आहेत.

२७ फेब्रुवारी रोजी सकाळी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महाड येथून धनगर समाजाच्या लाँग मार्चला प्रारंभ होईल. त्यानंतर वाहनाने सर्व जण कळंबोली येथे येतील. या ठिकाणाहून दुपारी पायी मोर्चाला सुरुवात होणार आहे. नेरूळ येथे पहिला तर सोमय्या मैदानावर दुसरा मुक्काम होणार आहे. यासाठी आताच राज्यभरातून हा समाज महामुंबईत येत आहे. विशेष म्हणजे शेळ्या-मेंढय़ा, घोडे तसेच कोंबडय़ांसह ते सहभागी होत आहेत.  महामुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त धनगर समाज मोठय़ा प्रमाणात स्थायिक झाला आहे. ते सर्व एकत्र आले असून या मोर्चाचे नियोजन करीत आहेत.

आमची एकच स्पष्ट मागणी आहे, धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाच्या प्रमाणपत्राची अंमलबजावणी तत्काळ व्हावी.

– प्रकाश महानवर, मोर्चेकरी