पूल अर्धवट; आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू

संतोष जाधव, नवी मुंबई</strong>

सप्टेंबर उजाडला तरी आयकर कॉलनीतील रहिवाशांचा धोकादायक प्रवास संपताना दिसत नाही. येथील रेल्वे पादचारी पुलाचे काम सुरू होऊन अनेक महिने झाले, तरी ते काम दृष्टिक्षेपात आलेले नाही. उद्घाटनप्रसंगी एप्रिल महिन्यात हा पूल खुला करण्यात येईल असे सांगण्यात आले, मात्र आजही काम न झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन रेल्वेमार्ग ओलांडून बेलापूर गावाकडे जावे लागत आहे.

बेलापूर गाव व आयकर कॉलनी यांच्यामधून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर रुळ ओलांडताना आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे काम हाणे गरजेचे आहे. लोकसत्ताने या पादचारी पुलाबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानंतर महासभेत या पुलाचा प्रस्ताव मंजूर झाला. पालिकेने रेल्वेकडे पाठपुरावा करीत ४ कोटींची रक्कमही रेल्वेला दिली. त्यानंतर खासदार राजन विचारे, स्थानिक नगरसेविका पाटील व विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणच्या कामाचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर पादचारी पुलासाठी फक्त खांब उभे करण्यात आले आहेत.

बेलापूर हे नवी मुंबईतील मूळ प्रकल्पग्रस्त गावांमधील प्रसिद्ध गाव. येथे मुख्य बाजारपेठ असल्याने सध्याच्या पालिकाक्षेत्रातील सर्व गावातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात. पासरिक हिलच्या पायथ्याशी आयकर वसाहत वसलेली आहे. बेलापूर गाव व वसाहतीच्यामधून हार्बर रेल्वेमार्ग गेल्याने या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण होते. आयकर वसाहतीत आजही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी, विद्यार्थ्यांना शाळेसाठी बेलापूर गावात ये-जा करावे लागते. हजारो नागरिक रेल्वेमार्ग ओलांडूनच ये-जा करतात. त्यामुळे रेल्वेअपघातात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. येथे पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग व्हावा यासाठी रेल्वेरोको, रास्तारोको आंदोलनही झाले होते.

लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने कामाला सुरुवात झाली मात्र काम रखडलेलेच आहे.  गेल्या १५ वर्षांपासून पादचारी पूल व्हावा यासाठी स्थानिक रहिवाशी मागणी करत आहेत. आयकर कॉलनीतून  बेलापूर गाव येथे जाण्यासाठी रेल्वेमार्ग ओलांडावा लागतो. अन्यथा २ किलोमीटर बेलापूर रेल्वेस्थानकाला वळसा घालून जावे लागते. या पुलाचे काम अद्यापही प्राथमिक स्वरूपात असल्याने दिरंगाई होत आहे.

अनेक वर्षे समस्या

* अनेक वर्षांपासून रेल्वे रुळ ओलांडून बेलापूरकडे जावे लागत आहे. शाळेतील मुलेही रेल्वेरूळ ओलांडून जात आहेत.

*  या ठिकाणी अनेक रहिवासी अपघातात मरण पावले आहेत. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास  त्याचा फायदा येथील रहिवाशांना होणार आहे.

पादचारी पुलाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. पुलासाठी लागणारे काम दुसरीकडे सुरू असून तयार पादचारी पूल आणून तेथे खांबावर बसवण्यात येणार आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करावे यासाठी रेल्वे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू.

– राजन विचारे, खासदार

नवी मुंबईतील दोनपैकी एक विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आजही कायम असून ही जागा निवडून आणण्याची ताकद काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात आहे. दोनपैकी एक जागा मिळाल्यास दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हिरिरीने काम करतील. आम्ही शेवटपर्यंत दावा कायम ठेवणार असून पक्षबांधणी सुरू करण्यात आलेली आहे.

-अनिल कौशिक, अध्यक्ष, नवी मुंबई काँग्रेस