उरणच्या पुनाडे गावात इतिहास संशोधकाना आढलेल्या विरगळी वरून उरण मध्ये १२ व्या शतकाच्या पूर्वमध्य युगा पासून बंदराच्या जागतिक व्यापाराचा आणि नौकायुद्धाचा इतिहास असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आज जगप्रसिद्ध असलेल्या जेएनपीटी बंदरातून होणार जागतिक व्यापार उरण मध्ये ८०० वर्षांपूर्वी होत असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील होणाऱ्या उत्तम प्रतीच्या मीठ उत्पादनामुळे मिठासाठी युद्ध झाले असावे असे इतिहास स संशोधक डॉ. अंजय धनावडे यांचे म्हणणे आहे. आशा प्रकारचा पुर्वमध्य युगीन इतिहासाची साक्ष असलेली अनेक शिलालेख व अवशेष उरण परिसरात आढळण्याची शक्यता आहे. त्यांचे जतन व संवर्धन आणि इतिहाचा उलगडा करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहकार्य करण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील प्राचीन मंदीरे, मुर्त्या यांचे जीर्णोद्धार करते वेळी संवर्धन व्हावे असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण तालुक्यातील पूनाडे या गावामध्ये आढळले १२ व्या शतकातील नौका युद्धाचे शिलाच्या रूपातील विरगळ आढळून आले आहेत. कोकण इतिहास परिषद रायगड शाखेने उरण आणि पनवेल तालुक्यातील गावांचे पुरातत्वीय दृष्टिकोनातील सर्वेक्षण सुरु केले आहे. याच सर्वेक्षणामध्ये उरण तालुक्यातील खाडीकिनारी असलेल्या उरण पनवेल तालुक्यांच्या सीमेवरील पुनाडे या गावामध्ये नौकायुद्ध कोरलेली शिल्पे आढळून आली आहेत. शिल्पांवरून हे युद्ध सुमारे आठशे वर्षापूर्वी झाले असावे असा अंदाज अभ्यासकांनी लावला आहे.

हेही वाचा >>>धक्कादायक! अडीच लाखात विकले १७ दिवसांचे बाळ..;आरोपीमध्ये आईचाही समावेश,वाचा प्रकार काय…

पूनाडे गावातील गावदेव बहिरी मंदिराच्या जवळ असलेल्या शेतात तीन वीरगळ आढळून आले आहेत. या शिलांना गावकरी मामा-भाचे म्हणून ओळखतात. वीरगळांचा खालचा भाग मातीत गाडला गेला असून उर्वरित भागाची झीज झालेली आहे. शिर्षभागी मंगल कलश असलेल्या वीरगळ शिल्पांची उंची सुमारे अडीच फूट असून ते तीन ते चार टप्प्यांत विभागले गेले आहेत. एक वीरगळ पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. उर्वरित दोन वीरगळांची झीज झालेले आहे. यातील एका वीरगळाच्या तीन बाजू कोरल्या गेल्या असून त्याच्या मधल्या टप्प्यात नौका युद्ध शिल्पांकित केले आहे. शिल्पांचे नीट निरीक्षण केले असता त्याच्या खालच्या भागात चितेवर जळणारा वीराचा मृतदेह, त्याच्या वरील भागांच्या मधल्या टप्प्यात नौका युद्ध कोरलेले आढळते. या युद्धात नौकेवर असलेले दोन योद्धे एकमेकांशी ढाल आणि तलवार घेऊन युद्ध करताना दिसतात. सर्वात वरच्या टप्यात स्वर्गप्राप्ती झालेला वीर शिवलिंगाची उपासना करताना दाखविला आहे. विशेष म्हणजे वीरगळावर दाखविलेल्या लाकडी नौका युद्धनौका नसून साध्या पद्धतीच्या आहेत. अशा नौका आजही मासेमारीसाठी स्थानिक लोक वापरताना दिसतात. त्याचप्रमाणे येथील भूपृष्ठावर खापरांचे अवशेष आढळून आले असून त्यात काचेचा लेप असलेली एक रंगी तेजस्वी लाल, पांढरी चमकदार पांढऱ्यावर निळ्या रंगाची नक्षी असलेली अशी पूर्व मध्ययुगीन आणि मध्ययुगीन खापरे असावीत असा अंदाज आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई: एपीएमसीत कांदा आवक निम्यावर, दरात वाढ

उरण तालुक्यास ऐतिहासिक महत्त्व आहे. रानवड, चाणजे, चिरनेर, आवारे यांसारख्या गावांमध्ये यापूर्वी देखील या भागात गजलक्ष्मी, वीरगळ, गद्धेगळ आणि सवत्स धेनुशिल्प म्हणजे गाय-वासरूसारखी प्राचीन इतिहासाची साक्षीदार असलेली शिल्पे आणि शिलालेख आढळून आले आहेत. अशा ऐतिहासिक पुराव्यावरून उत्तर कोकणवर राज्य करणाऱ्या शिलाहार म्हणजे आजचे शेलार या राजघराण्याचे वर्चस्व या भागावर असल्याचे इतिहास सांगतो. उरण परिसरात आढळणाऱ्या अनेक वीरगळांसारख्या स्मृतिशिळावरून लक्षात येते. असे असले तरी येथे सागरी मार्ग होणारा परदेशी आणि स्थानिकरित्या व्यापार चालत असल्याचे ठोस पुरातत्त्वीय पुरावे अद्याप आढळले नव्हते. पुनाडे येथे आढळून आलेल्या वीरगळावरील नौका युद्धावरून ही बाब निश्चित होते. एकूण शिल्पशैली वरून हे वीरगळ बाराव्या शतकातील असावेत असे म्हणता येते. येथील परिसरात आढळून आलेल्या मृदभांड खापरावरून या वरून हा परिसर दहाव्या शतकापासूनच चीन, इराण यांसारख्या ठिकाणांशी आंतरराष्ट्रीय व्यापारात गुंतला होता हेही लक्षात आले. या मोहिमेत कोकण इतिहास परिषदेच्या तुषार म्हात्रे, विजय गावंड, अभिषेक ठाकूर आणि महेश पाटील यांचा सहभाग होता.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A history of world trade and naval warfare in the middle ages uran amy