पोलीसांसमवेत कारवाई कधी?

नवी मुंबई– स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे शहर असलेल्या नवी मुंबई महापालिकेला शहरात विविध विभागात रस्त्यावर दिवेदिवस रस्त्यावर धुळखात पडलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा स्वच्छता अभियानामध्ये अडथळा येऊ लागला आहे. एकीकडे शहर स्वच्छतेसाठी शहर सौंदर्यीकरणाबरोबरच प्रत्येक गोष्टीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला या रस्त्यावरील धूळखात पडलेल्या भंगार गाड्यांचे करायचे काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत तात्काळ कारवाई करत या रस्त्यावरील घूळखात पडलेल्या गाड्या हटवण्याची मागणी नागरीकांकडून तसेच पालिका सफाई कामगारांकडूनही होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “आपण कार्यकर्ते नाही तर सैनिक, आता जिंकेपर्यंत लढायचे आहे”; नवी मुंबईतील मेळाव्यात शिवसैनिकांची शिवगर्जना

देशात प्रथम क्रमांकाचे ध्येय नजरेसमोर ठेवून पालिका यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उतरली असली तरी अनेक ठिकाणी अद्याप स्वच्छ सर्वेक्षणात उणीवा समोर येत असल्याचे चित्र आहे. अद्यापही अनेक ठिकाणी कचरा पडलेला पाहायला मिळतो. त्यामुळे पालिकेने आणखी कटाक्षाने काम करण्याची आवश्यकता आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नुकत्याच झालेल्या स्वच्छताबाबतच्या  बैठकीत  सुधारणेच्या दृष्टीने प्रत्यक्ष स्थळभेटी देऊन स्वच्छताविषयक पाहणी करण्याचे व त्यामध्ये सुधारणेच्या अनुषंगाने तत्परतेने बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.शहर स्वच्छतेत अडथळा ठरणाऱ्या रस्त्याकडेला भंगार स्थितीत असलेल्या गाड्या पोलिसांच्या मदतीने  हटवण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे.

शहर स्वच्छतेकडे लक्ष देताना महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये योग्य समन्वय राखला जावा, जेणेकरून कामाला गती मिळेल असे स्पष्ट करीत आयुक्तांनी स्वच्छता हे आपले प्राधान्य आहे हे लक्षात ठेवून प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करावे असे सूचित केले.स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही विशेष लक्ष देण्याविषयी सूचना करताना नागरिकांना व नवी मुंबईत येणा-या पर्यटकांना पाहण्यास आनंददायी वाटेल अशा स्वरूपात चौक, मोकळ्या जागा, कचराकुंडी हटविलेल्या जागा यांचे नवनव्या संकल्पना राबवून सुशोभिकरण करण्यात येत असले तरी शहराचे वेगळेपण अधोरेखीत करणा-या अभिनव संकल्पना शहर सुशोभिकरणात राबवाव्यात असे त्यांनी सांगितले. सामुदायिक शौचालयांची स्वच्छता, तलाव व नाले यांची स्वच्छता, कचरा वर्गीकरण व संकलन, कचरा वाहतुक आणि त्यावरील प्रक्रिया, डेब्रिजचे निर्मुलन, सांडपाण्याचे व्यवस्थापन या अनुषंगाने कोणत्या गोष्टींकडे, कसे लक्ष द्यावे आणि कोणते बदल करावेत याबाबत अपेक्षित सुधारणा करण्याचे निर्देशित केले आहे. शहरातील बराचसा भाग सिडको, एमआयडीसी, रेल्वे यांच्या अखत्यारित असून स्वच्छतेमध्ये त्यांचाही सक्रीय सहभाग अतिशय महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या क्षेत्रातील स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देणे ही शहराच्या मानांकनासाठी त्यांचीही जबाबदारी आहे. याकरिता या प्राधिकरणांच्या संबंधित अधिका-यांची स्वच्छताविषयक बैठक आयोजित करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : श्री सदस्यांकडून महास्वच्छता अभियान

नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघा या पट्ट्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बेवारस व धुळखात पडलेली वाहने पाहायला मिळतात. त्यामुळे रस्ते स्वच्छ मात्र धूळखात पडलेल्या गाड्या रस्त्यावर असल्याने शहरात स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे. याबाबत तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे तसेच अभिजीत बांगर यांच्या काळात शहरातील बेवारस गाड्यांवर महापालिका विभाग अधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावून व अश्या बेवारस गाड्यांवर नोटीस चिकटवून  ठराविक दिवसात या गाड्या पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर नेल्या जात होत्या. परंतू आता पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले असून याबाबत कडक कारवाई करण्याची अपेक्षा सामान्य नागरीकांकडून करण्यात येत आहे.शहरात रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांमुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला बाधा निर्माण होत आहे. एकीकडे स्वच्छतेच्या नावाने करोडो रुपये स्वच्छ सर्वेक्षणावर खर्च केले जात असताना दुसरीकडे भंगार व धूळखात पडलेल्या गाड्या मात्र स्वच्छतेत अडथळा निर्माण होत आहेत, पालिका आयुक्त  राजेश नार्वेकर  यांनी  नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्यावेळी शहरातील भंगार गाड्यांबाबत  पोलीसांच्या मदतीने कारवाई करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.परंतू अद्याप याबाबत वेगवान हालचाली होताना पाहायला मिळत नसल्याचे चित्र आहे.

रस्ते  साफसफाई कर्मचाऱ्यांनाही अडथळा..

रस्त्यावरील धूळ खात पडलेल्या गाड्यांमुळे शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा पोहचत असून दुसरीकडे रस्ते साफसफाई करणाऱ्या कर्माचाऱ्यांना अश्या गाड्यांखालील सापसफाई करता येत नसल्याने रस्ते स्वच्छ पण भंगारस्थिती उभ्या राहीलेल्या गाड्यांखालीमात्र कचऱ्याचे व धुळीचे साम्राज्य असल्याने याबाबत पालिकेने या गाड्या हटवल्यातरच नीट सापसफाई करता येईल असे सांगीतले..

रस्त्यावरील धूळखात पडलेल्या गाड्यांबाबत पालिका आयुक्तांनी स्वच्छता आढावा बैठकीत विचारणा केली असून या गाड्या हटवण्याबाबत एखादा भूखंड पाहून त्यावर या गाड्या हटवण्याबाबत विचारणा केली आहे. पोलीसांच्या मदतीने या गाड्यांवर नोटीसा लावून त्यावर कारवाई करत गाड्या हटवण्याबाबत लवकरच आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याचे नियोजन आहे. डॉ.बाबासाहेब राजळे, उपायुक्त ,घनकचरा व्यवस्थापन

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abandoned vehicles on navi mumbai road scrap cars on the navi mumbai road zws
Show comments