नवी मुंबई – राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहराला पाणीपुरवठा कणाऱ्या धरणात पाणीसाठी निम्म्यावर आला असून जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे आव्हान पेलावे लागणार असताना दुसरीकडे स्वताःच्या मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबईतील मोरबे धरणात मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अधिक जलसाठा शिल्लक आहे. परंतु तरीही नागरीकांनी पाण्याचा वापर जपूनच करा असे आवाहन केले आहे. मोरबे धरणात अजून १८८ दिवस शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याएवढा जलसाठा धरणात शिल्लक आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमध्ये जवळजवळ अर्ध्यावर पाणीसाठा शिल्लक असून मागील काही दिवसांपासून मुंबई व नवी मुंबईतही तापमानाचा टक्का अधिक आहे. तर त्या तुलनेत मोरबे धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे.त्यामुळे नवी मुंबईला ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे.
नवी मुंबई महापालिकेेचे मोरबे धरण यावर्षी २८ ऑगस्ट २०२४ ला १०० टक्के भरले व धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. पालिका आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते यंदा जलपूजनही करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही मुंबई महापालिकेनंतरची देशातील पहिली महापालिका आहे. परंतु लोकसंख्येच्या मानाने धरणातून अधिक पाणीउपसा केला जात आहे. दिवसाला धरणातून ४५० दशलक्षलीटर पेक्षा अधिक पाणी उपसा केले जात असून त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांना पालिका प्रशासनाकडून जपून पाणी वापराचे आवाहन केले जात असताना पालिका प्रशासनानेही प्रतिमाणसी फक्त २०० लीटर पाणीच देणे आवश्यक आहे.

यंदा मोरबे धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. पाणी उपशाबाबत योग्य काळजी घेण्यात येत असून उद्याने व इतर ठिकाणी जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करण्यावर भर दिला आहे. धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक पाणी असले तरी पाणीपुरवठ्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. – अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका