नवी मुंबई : ठाणे-पनवेल महामार्गावर घणसोली येथे एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हत्या चार तारखेला झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुजितकुमार रामसजिवन बिंद्र असे यातील मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मृतदेह ठाणे-बेलापूर मार्गावर घणसोली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या एका हॉटेलपुढे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडीत आढळून आला आहे. मृत व्यक्तीजवळ आढळून आलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली असून तो डम्पिंग रस्ता, मुलुंड येथे राहतो तर मूळ उत्तर प्रदेश येथील प्रतापगढ येथील रहिवासी आहे. त्याच्याकडील कागदपत्रात आढळलेल्या पत्त्यावर पाहणी केली असता त्याचा मोठा भाऊ पवनकुमार हा आढळून आला. त्याला याबाबत माहिती दिल्यावर त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : ३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दोन दिवसांत सोनसाखळीचा शोध

याबाबत तपास सुरू असून हत्या का करण्यात आली तसेच कोणी केली याचा शोध सुरू आहे, अशी माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी दिली.

Story img Loader