जगदीश तांडेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : तालुक्यात औद्योगिकीकरण आणि नागरीकणामुळे झपाट्याने लोकसंख्या वाढत असून उरणकरांच्या पाण्याची तहान भागविणारे जलस्रोत अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे रानसई धरणातून पाणी पुरवठा करतांना सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज उसने पाणी घ्यावे लागत आहे. पावसाळ्यानंतर सध्या सिडकोकडून दररोज ४ एम एल डी पाणी घेण्यात येत आहे. मात्र तरीही पुढील वर्षाच्या प्रारंभी पुन्हा एकदा पाणी कमी पडत असल्याने नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

उरण मधील जलस्तोत्र वाढविण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले होते मात्र त्याची आजही प्रतीक्षा आहे. या वाढत्या समस्येमुळे उरण मधील अनेक भागात पाणी टंचाईचे संकट ओढावत  आहे.  पाणी साठ्यात वाढीसाठी रानसई धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव आज ही शासनस्तरावर पडून राहिला असल्याने वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाईची समस्या भविष्यात उरणमध्ये तीव्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> उरण : अवजड कंटेनररुपी यमदूताना आणखी किती बळी हवेत?

उरण तालुका हा अरबी समुद्राच्या कुशीत आणि मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर वसलेला तालूका आहे.या तालुक्यात एन.ए.डी, ओएनजीसी, जेएनपीटी बंदर,भारत गॅस, महावितरण प्रकल्प हे केंद्र व राज्य सरकारचे महत्त्वाचे प्रकल्प असून या प्रकल्पावर आधारित इतर अनेक प्रकल्प उद्ययास येत आहेत.या प्रकल्पांना, रहिवाशांना उरण तालुक्यातील रानसई व पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तसेच सिडकोच्या माध्यमातून पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या उरण तालुक्याची लोकसंख्या ही अडीच लाखांहून अधिक असून त्यात वाढ सुरूच आहे.

उरण तालुक्याच्या जवळच नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व शिवडी – न्हावा सेतू ( सिलींग) लवकरच उद्यास येत असल्याने या परिसराचा विकास साधण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला आहे.त्यामुळे भविष्याचा विचार करता, येत्या पाच,दहा वर्षांत या तालुक्यातील लोकसंख्या ही दुपटीने, तिपटीने वाढणार आहे.तसेच प्रकल्पही जोमाने वाढणार आहेत.त्यासाठी पाण्याची गरजही भासणार आहे.दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात उरणला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढ करण्यासाठी धरणांच्या बंधाऱ्याची उंची वाढवावी असा निर्णय घेण्यात आला होता.परंतु त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही.

हेही वाचा >>> नवी मुंबई : दिवाळीतील वाहतूक कोंडीवर उपायांचे प्रयत्न

उरण तालुक्यातील रानसई व पुनाडे धरणातील पाणीसाठ्याची पातली ही एप्रिल महिन्यात घटत  असल्याने एप्रिल ते जुलै चार महिन्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळेच या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सध्याचे जलस्रोत अपुरे पडत आहेत. त्यासाठी नवीन जलस्रोत तयार करणे ही काळाची गरज आहे. नव्या वर्षात पाणी कपातीची शक्यता : उरणच्या रानसई धरणात डिसेंबर अखेर पर्यंत पुरवठा करता येईल इतका साठा आहे. त्याच्या जोडीला सिडकोच्या हेटवणे धरणातून ४ एम एल डी पाणी मिळू लागल आहे. मात्र तरीही पुढील जुलै पर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी जानेवारी पासून कदाचित कपात करावी लागते असे संकेत उरणच्या एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco borrow water from hetwane dam for ransai dam to keep smooth water supply in uran zws
Show comments