उरण : शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकची भर पडत आहे. या कोंडीवर महत्त्वपूर्ण उतारा असलेल्या उरण बाह्यवळण (बायपास)मार्गाची प्रतीक्षा कायम आहे. ही प्रतीक्षा केव्हा संपणार असा सवाल आता वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले उरणकर नागरिक विचारत आहेत.नगरपरिषद हद्दीतील जमिनी आणि त्यावरील बांधकामे यांच्या भूसंपादनाचा अथडळा निर्माण झाला आहे. यासाठी लागणारा निधीही उपलब्ध नसल्याने हा मार्ग पूर्णत्वास येण्यासाठी आणखी किती वेळ लागेल ते स्पष्ट होत नाही. त्यामुळे उरणच्या प्रवासी व नागरिकांना आणखी काही महिने या मार्गाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

उरण शहर आणि परिसराचे झपाट्याने नागरीकरण सुरू आहे. येथील लोकल, रस्ते मार्ग, जलमार्ग यांनी जोडले गेले आहे. त्यामुळे नागरीवस्ती वाढू लागली आहे. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडली आहे. उरण बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव २००१ साली पहिल्या युती सरकारच्या काळात मांडण्यात आला. उरण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहराला जोडणाऱ्या उरण-पनवेल या मुख्य मार्गालगत मोरा मार्गाला जोडणारा बाह्यवळण मार्ग प्रस्तावित होता. त्याचे भूमिपूजनही करण्यात आले मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २००८ ला सिडकोच्या निधीतून बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या मार्गात कांदळवन असल्याने त्यांच्या परवानग्या मिळण्यासाठी अनेक वर्षे लागली. त्यामुळे या मार्गाच्या खर्चात वाढ झाली. आज या बाह्यवळण मार्गाचा खर्च २७ कोटींच्या घरात गेला आहे. या मार्गाचे काम वेगाने व्हावे याकरिता आ. महेश बालदी यांनीही पाठपुरावा केला.

सध्या सिडकोच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या या एलिव्हेटेड मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हे कामही संथ गतीने सुरू आहे. तर या मार्गाला जोडणाऱ्या उरण नगर परिषदेच्या हद्दीतील भूखंडावर घरे आहेत. त्यासाठी पनवेलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून येथील जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यासाठी लागणारा निधी मिळावा याकरिता शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. उरणच्या बाह्यवळण मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या भूखंडावर कुळांची घरे आहेत. यासाठी ११ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळताच मार्गाचे काम पूर्ण होईल. निखिल दोरे, शहर अभियंता, उरण नगर परिषद

Story img Loader