उरण : विकासाच्या नावाने उरणमधील खारफुटी व पाणथळी या मातीचा भराव करून झपाट्याने बुजवल्या जात असून यामुळे उरणला पुराचा धोका निर्माण झाला आहे, भूजल पातळीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे असं मत ‘ नॅटकनेक्ट फाउंडेशन’ या पर्यावरणवादी संस्थेने व्यक्त केलं आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून त्यांनी या समस्येची दखल घेतल्याचा दावा संस्थेने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई सेझवर ‘अल्ट्रा मॉडर्न आयटी हब’ प्रकल्प राबविताना येथील पाणथळी व खारफुटी नष्ट करणे हानीकारक असल्याने याची दखल घेण्याची विनंती पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. नॅटकनेक्ट फाउंडेशनने केलेल्या या तक्रारीला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण आणि वन सचिवांना या प्रकरणाची तपासणी करण्याचे आणि पुढे कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा… दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन ६ एप्रिल नंतरच

राज्य शासनाने नुकतीच नवी मुंबई सेझला एकात्मिक औद्योगिक प्राधिकरण यामध्ये बदल करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे या भूखंडाचा ८५% व्यावसायिक आणि १५% रहिवासी उद्देशासाठी वापर केला जाणार आहे. सिडकोने मोठ्या प्रमाणात खारफुटी प्रभाग आणि पाणथळ क्षेत्रांना नवी मुंबई सेझला वितरण केल्याबद्दल नॅटकनेक्ट फाउंडेशनने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला (एमओइएफसीसी) आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.

हेही वाचा… शिवस्मारकात पक्ष विरहित नोकर भरती करा जासई ग्रामपंचायतीची मागणी

उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्च-अधिकार समित्यांनी अंमलबजावणी न केल्यामुळे खारफुटी व पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न हे विफल ठरले आहेत. यामुळे आगामी प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा –हास होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. खारफुटी व पाणथळ जागांवर अमानुष पध्दतीने घातला जाणारा भराव यामुळे आता परिसरातील गावांमध्ये आणि भातशेतीमध्ये पावसाळ्यात पुर येत आहे असे ‘सागरशक्ती’ या पर्यावरणप्रेमी संस्थेचे संचालक नंदकुमार पवार यांनी सांगितले.

हेही वाचा… बोकडवीरा ते शेवा उड्डाणपूल अंधारात सिडकोच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष

“आमचा विकासाला विरोध नाही, खारफुटी व पाणथळ जमीनींवर तयार केलेल्या रस्त्यांवर भेगांच्या मार्फत निसर्गाने आधीच निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे , त्यामुळे उरणमधील अनेक गावे देखील पुराच्या अंमलाखाली आली आहेत” असं मत ‘नॅटकनेक्ट फाउंडेशन’चे संचालक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केलं आहे. या परिसरात पाणी शोषून घेण्यासाठी एक इंचभर देखील जमीन शिल्लक राहणार नसल्याने उरण क्षेत्राला पुराचा तडाखा बसेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood risk to uran and area due to destruction of wetlands and mangroves a for development projects asj