नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण असल्यानेच नवी मुंबईला जलसंपन्न शहर संबोधले जात असताना शहरात सुरू असलेली पाणीकपात भूषणावह नसून पाणीकपात सहन केली जाणार नसल्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिला आहे.

नाईक यांची महापालिका प्रशासनाबरोबर मंगळवारी नियमित बैठक झाली. या बैठकीमध्ये पाणीकपातीवर नाईकांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. आपल्या हक्काचे पाणी कुठे पळवले जातेय त्याचा शोध घ्या, असे नाईक यांनी प्रशासनाला सांगितले.

आजच्या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा – नवी मुंबई : फिरस्ती विक्रेत्याप्रमाणे गांजा विकणारे २ अटकेत, तीन फरार 

नवी मुंबईला बारवी धरणातून मिळणारा हक्काचा पाणी कोटा मिळत नाही. मोरबे धरण नवी मुंबईकरांचे धरण असून धरणातून सर्वप्रथम नवी मुंबईला पुरेल एवढा पाणीपुरवठा झाला पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी अन्यत्र वळवू नका असा इशाराच त्यांनी पालिका प्रशासनाला दिला.

झोपडपट्टी, गाव, गावठाण, शहर सर्वच भागात समान पद्धतीने पाण्याचे वितरण करावे अशा सूचना नाईक त्यांनी केल्या. एकीकडे पावसाने ओढ दिली असून पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी पालिकेने शहरात मागील काही दिवसांपासून पाणीकपात सुरू केली आहे. त्यामुळे शहरात कमी-अधिक प्रमाणात पाणीकपातीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

हेही वाचा – पनवेलमध्ये सकाळपासून कोकण पदवीधरांचे उत्साहात मतदान

एमआयडीसीकडून नवी मुंबईला हक्काचे दररोज ८० दशलक्ष लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. परंतु एमआयडीसीकडून फक्त ६५ एमएलडी पाणी मिळत असल्याने नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी कोण पळवतेय असा प्रश्न निर्माण झाला आहे.