नवी मुंबई: एकही आमदार अपात्र ठरणार नसून, सरकार पडणार नाही असा ठाम विश्वावर आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील नेरुळ येथे पक्षाच्या आढावा बैठकी निमित्त ते आले असता त्यांनी विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षावरही टिकास्त्र सोडले. नवी मुंबई प्रहार संघटनेची आढावा बैठक आज नेरुळ येथे पार पडली. याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार बच्चू कडू उपस्थित होते. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेत आगामी काळातील कामांबाबत मार्गदर्शन केले. आणखी वाचा-VIDEO: “केरळची सत्य परिस्थिती केरळची आहे, विदेशातून…”, आकडेवारी देत जितेंद्र आव्हाडांचं ‘द केरला स्टोरी’वर भाष्य, म्हणाले.. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षावरही टिका केली. "सध्या सभा सर्वत्र होत असून एकाने सभा घेतली की दुसरा घेतो. यातून लोकांना काय मिळते? अशा पद्धतीने चढाओढीने सभा घेणे मूर्खपणा आहे. कामे केली तर सभेची गरज नाही " असा प्रहार कडू यांनी यावेळी केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल काही येऊदे, सरकार हेच राहील, एकनाथ शिंदे आणि पंधरा आमदार अपात्र होणार नाहीत, त्यांनी कोर्टात ठोस कागदपत्र सादर केली आहेत,त्यामुळे हेच सरकार राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आघाडी सरकार असताना बच्चू कडू मंत्री होते मात्र शिंदे सरकार मध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही यावर त्यांनी भाष्य करताना म्हटले की माझे मंत्रिपद गेले, या सरकार मध्ये अजून मिळाले नाही,तरी मी खुश आहे कारण दिव्यांग मंत्रिमंडळाची स्थापना झाली.आता मंत्रिमंडळाचा विस्तार २०२४ नंतर होईल असे सांगत त्यावेळी वर्णी लागू शकते असे अप्रत्यक्ष मत प्रगट केले.