नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. पाच ही बाजार आवाराबाहेर अनधिकृत पार्किंग, वाहतूक कोंडी, फेरीवाले यांचे बस्तान वाढत आहे.
एपीएमसी भाजीपाला बाजाराबाहेर फुटपाथवर अनधिकृत व्यावसायिकांनी पदार्थ बनविण्यासाठी ज्वलनशील साहित्य व्यवसाय पदपथावर थाटला आहे. कोणतीही अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसून रस्त्यावरच गॅस सिलेंडर सारखे ज्वलनशील साहित्य ठेवल्याने भविष्यात मोठी दुर्घटना, घातपात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येथील अनधिकृत व्यवसायिकांना हटविण्याचे मागणी होत आहे. मात्र याठिकाणी त्या दुकानधारकांकडून फुटपाथवरील जागेची भाडे वसुली करून जागा उपलब्ध करून दिली जाते असा आरोप बाजार घटकांमधून व्यक्त होत आहे. एपीएमसी आवारात आधीच फेरीवाले यांचे बस्तान असते त्यात आता माथाडी भवन चौकात अनधिकृत पणे गाड्या उभ्या करून शेतमालची विक्री व्यवसाय केला जात आहे. रस्त्यावरच वाहने उभी केल्याने परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. एपीएमसी ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
पंरतु शेतमालावरील नियमन मुक्ती उठवल्याने एपीएमसीतील महत्वाच्या मुख्य चौका चौकात, रस्त्यावर गाड्या उभ्या करून शेतमालाची विक्री केली जात आहे.
फुटपाथवरील वाढीव जागेत दुकानदारांच्या सामानाची दाटी
एपीएमसी से.१९ येथील बाजार आवारात ही वाढीव जागेचा वापर सुरूच आहे. एकेकाळी वाढीव जागेच्या वापरावर कारवाईचा बडगा उरगला होता, पंरतु आता पालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. एपीएमसी माथाडी भवन येथील बाजारात आधीच पार्किंगची समस्या उद्भवत आहे. हा रस्ता पाचही बाजाराला जोडला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमीच असते. त्यामध्ये रस्त्यावर अनधिकृत पार्किंगचा विळखा असतो,अशातच येथील व्यापारी दुकान धारक आपला बाजार वाढीव जागेत मांडून ठेवत असतात. याठिकाणी विद्याुत रोषणाईचे सामान, किराणा बाजार, करकोळ बाजार, असे अनेक प्रकारचे साहित्य फुटपाथवर अधिक जागेत पसरवून ठेवून सामायिक जागेचा वापर करीत आहेत. रस्त्यालगत पार्किंग व फुटपाथाला लागून व्यापाऱ्यांचे बस्तान यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरुन जाताना त्रास सहन करावा लागत आहे.
वाहनतळाअभावी एपीएमसीत पार्किंगचा बोजवारा
- एपीएमसी बाजारात दररोज हजारोंच्या संख्येने मोठं मोठे ट्रक, टेम्पो, अवजड वाहने यांची रहदारी असते. पहाटे सकाळी दाखल होणाऱ्या वाहनांना वाहनतळ उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच उभी केली जातात. एपीएमसी बाजारात पार्किंग साठी उपलब्ध असलेला एकमेव ट्रक टर्मिनल होता.
- मात्र त्या ठिकाणी आता सिडकोच्या वतीने गृहनिर्माण संकुल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने पाचही बाजाआवारा बाहेर रस्त्यावर ट्रक उभे केले जातात.