नवी मुंबई : मुंबई महानगर पट्ट्यातील उपनगरांना कृषीमालाचा पुरवठा करणाऱ्या वाशीतील सर्वात मोठ्या बाजारपेठांना बेकायदा बांधकामे, नियमांची ऐशीतैशी करत साठविण्यात येणारे ज्लवनशील पदार्थ आणि अवैध पद्धतीने होणाऱ्या वाहनांच्या वावरामुळे अवकळा आली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने व्यापारी, खरेदीदार, माथाडी तसेच सर्वसामान्य ग्राहकांचा वावर असलेली या बाजारपेठा अग्निकल्लोळाच्या उंबरठ्यावर उभ्या असल्याचा धक्कादायक अहवाल बाजार समिती प्रशासनाने नेमलेल्या समितीने सादर केला असून या घटना टाळण्यासाठी कठोर अशा उपायांची जंत्रीच सुचवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या फळ बाजारात नोव्हेंबर २०२२ मोठी आग लागली होती. आंबा मोसमात या बाजारपेठांमध्ये गवत आणि लाकडी पेट्यांचा खच पडलेला असतो. या आगीच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने एका समितीचे गठण केले होते. या समितीच्या सदस्यांनी कृषी मालाच्या पाच बाजारांची पाहणी करून अग्निशमन तपासणी अहवाल तयार केला असून या अहवालात काही धक्कादायक निरीक्षणे सादर करण्यात आले आहेत. तसेच या बाजारपेठांना मोठ्या दुर्घटनेपासून वाचविण्यासाठी कठोर अशा उपायांची जंत्री सादर केली आहे.

हेही वाचा : एपीएमसी बाजार समिती शीतगृह देणार भाड्याने

बाजार नव्हे, बेकायदा बांधकामांचे आगार

समितीने केलेल्या पहाणीत पाचही बाजारांमधील बहुतांश व्यापारी गाळ्यांमध्ये आग प्रतिबंधासाठी कोणत्याही उपाययोजना दिसून आलेल्या नाहीत. बाजारातील वेगवेगळ्या गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाल असून पोटमाळे, अवैध जीने यामुळे हे बाजार बेकायदा बांधकामांचे आगार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. काही बाजारांमधील गाळ्यांच्या तळमजल्यावर तसेच पहिल्या मजल्यावरही विविध प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्यात आल्याचे या समितीला दिसून आले. या साठा करताना बाजार समिती प्रशासन अथवा कोणत्याही यंत्रणेची परवानगी घेण्यात आलेली नाही.

हेही वाचा : उरण: ओएनजीसी तेल बाधितांचा मोर्चा; टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनानाचा निषेध

वाहनांचा वावरही धोकादायक

या बाजारांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची येजा सुरु असते. कृषी मालाची ने आण करणारे मोठे ट्रक, टेम्पो बाजारात येत असतात. या गाड्या मनमानेल त्या पद्धतीने बाजारात उभी केली जातात. त्यामुळे दुघर्टना घडल्यास वाहनांचे नियोजन कसे करायचे असा सवाल या अहवालात उपस्थित करण्यात आला आहे. ट्रक व टेम्पोमधून जागेवर सामान चढवणे आणि उतरवण्याचे काम सुरू असताना यादरम्यान कुठल्याही प्रकारची आगीची सुरक्षा बाळगली जात नाही, असेही निदर्शनास आणण्यात आले आहे. बाजारांमधील स्टॉलधारक अतिरिक्त जागेचा वापर करीत आहेत. गाळ्या समोर टेबल टाकून व्यवसाय सुरू आहे. केबिनच्या बाजूला अनधिकृत स्टॉलचा वापर, काही गाळ्याच्या तळमजल्यावरील अंतर्गत प्रसाधनगृहाचे रूपांतर करून त्या जागेचा व्यवसायिक वापर सुरू असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

हेही वाचा : पनवेल पालिकेच्या ३७७ जागांसाठी १ लाख १५ हजार अर्जांची नोंदणी; अर्ज नोंदणीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक

अहवालात सुचविण्यात आलेल्या उपाययोजना

अग्नी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक १०० फुटावर किंवा ३० मीटर अंतरावर अग्निशामक यंत्रणा बसवावी. तसेच जमिनीखाली एक लाख लिटर क्षमतेच्या पाण्याची टाकीचे व्यवस्था करावी, अशी प्रमुख उपाययोजना या अहवालात सुचविण्यात आली आहे. फायर फायटिंग पंप, जॉकी पंप, मेन पंप, स्टँडबाय पंप, डिझेल पंप बसविण्याचे सुचविण्यात आले आहेत. बाजारातील अतिक्रमणाबाबत संबंधितांना नोटीस देण्यात यावी. अतिक्रमण हटविले नाही तर महापालिकेला याबाबत लेखी पत्र देऊन बाजारातील अनधिकृत बांधकामाबाबत अवगत करावे अशा उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai apmc high possibility of fire due to flammable materials and illegal constructions css