नवी मुंबई : मालवाहतूकदारांचा संप मिटला असला तरी अद्याप कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक नियमित झालेली नाही. परराज्यातील शेतमालाच्या गाड्या बुधवारीही आल्या नाही. फक्त गुजरातमधून काही गाड्या शेतमालाची आवक झाली. त्यामध्ये कडधान्यांचा समावेश होता. दरम्यान भाजीपाला बाजारामध्ये राज्यभरातून पुरेशी भाजी आल्याने दरात फारसा फरक पडला नाही. मात्र किरकोळ बाजारात भाज्या चढ्या दराने विकल्या जात आहेत.
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या दुरुस्ती विरोधात सोमवारपासून तीन दिवस मालवाहतूकदारांनी संप पुकारला होता. मात्र मंगळवारी रात्री संप मागे घेण्यात आला. तरीही काही छोट्या संघटनांनी वाहने बाहेर काढल्या नसल्याची माहिती एका ट्रक चालकाने दिली . याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजारात पडला दोन दिवस दिसून आला. त्यामानाने बुधवारी गाड्या आल्या. मंगळवारी भाजी बाजारात केवळ ५१६ गाड्यांची आवक झाली तर बुधवारी ५६० गाड्यांची आवक झाली. मात्र परराज्यातील गाड्या न आल्याने आजही परराज्यातून येणाऱ्या वाटाणा, गाजर, फ्लॉवर, फरसबी अशा भाज्यांचे दर मंगळवारच्या तुलनेत चढे राहिले. मात्र राज्यातून होणारी आवक नियमित असल्याने या भाज्यांचे दर नियमित होते, अशी माहिती एपीएमसीतील व्यापारी रामदास पवळे यांनी दिली. कदाचित उद्यापासून दर स्थिर होतील अशी अपेक्षा वाशी डेपोनजीकचे किरकोळ भाजी व्यापारी दीपेश शर्मा यांनी दिली.
हेही वाचा… दाट धुक्यामुळे रेल्वे रखडली
दोन दिवसांच्या मालवाहतूकदारांच्या संपाने भाजीत नियमित आणि स्वस्त मिळणाऱ्या मटारच्या दरात अचानक एवढी उसळी घेतल्याने आश्चर्य वाटले. गाजर सुद्धा महाग झाले आहे, अशी प्रतिक्रिया माधुरी फसवलकर या गृहिणीने दिली.
भाजी, घाऊक दर – किरकोळ दर
वाटाणा, ६५ ते ७० – १२० ते १४०
गाजर ५४ ते ५८ ८० ते ९०
फुल कोबी, २४ ते २७ – ६० ते ७०
फरसबी, ५२ ते ५५ – ७० ते ८०
हेही वाचा… पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांच्या भव्य उदघाटनासाठी नवी मुंबई विमानतळावर सिडको मैदान बनविणार
पेट्रोल पंपांवर सुरळीत इंधन पुरवठा
दरम्यान, नवी मुंबईतील बहुतांश पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलचा साठा पुरेसा होता. तसेच पुरवठ्यात काही फरक पडला नव्हता मात्र इंधन तुटवड्याच्या बातमीने मंगळवारी बहुतांश पेट्रोल पंपावर दुपारनंतर गर्दी उसळली होती. मात्र बुधवारी सर्वत्र सुरळीत होते.