नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी धान्य बाजारातील स्टॉलधारकांकडून रस्त्यावरच साहित्य विक्रीसाठी ठेवून रस्त्याची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांना चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही स्टॉलधारकांनी अतिरिक्त जागेचा वापर करत रस्त्यावरही बस्तान मांडले आहे.

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारात एपीएमसी प्रशासनाने २० ते २५ वर्षांपूर्वी पाच बाजारातील पदपथांवर काही लहान व्यावसायिकांना व्यवसायासाठी स्टॉल वितरित केले आहेत. मात्र सध्या काही विनापरवाना स्टॉलदेखील उभारले आहेत. शिवाय काही स्टॉलधारक वितरित केलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागेचा वापर करत असून विविध साहित्य ठेवून रस्ता अडवून बसले आहेत. रसवंतिगृहात रस्त्यावर टेबल-खुर्ची मांडून व्यवसाय सुरू आहे, तर खाद्यापदार्थ विक्रेते यांच्याकडून रस्त्यावरदेखील साहित्य मांडण्यात येत आहे. त्यामुळे आधीच हे स्टॉल पदपथावर वितरित केल्याने पादचाऱ्यांची वाट अडली आहे. आणखी त्यात भर म्हणजे या स्टॉलधारकांकडून रस्त्यावर साहित्य ठेवून रस्ता अडवला जात आहे. त्यामुळे बाजारात नागरिकांनी चालायचे कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या ठिकाणी एपीएमसी प्रशासनाने योग्य ती कारवाई करून रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : सट्टा बाजारात गुंतवणूक करा भरघोस परतावा मिळवा …. फसव्या जाहिरातीला बळी पडून १३ कोटी ५६ लाख गमावले

एपीएमसीत गेल्या कित्येक वर्षांपासून बाजारातील पदपथांवर काही स्टॉलधारकांना परवाने देऊन स्टॉलसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यात आता किती अधिकृत आहेत, किती विनापरवाना आहेत, याबाबत माहिती घेण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव, एपीएमसी

Story img Loader