नवी मुंबई : नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाला भाजप आमदार गणेश नाईक खीळ घालत आहेत. त्यांच्यामुळेच हा प्रकल्प राबविण्यात अडचणी येत आहेत असा थेट आरोप शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदमध्ये केला. केवळ निवडणुका आल्या की झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा नाईक यांना आठवतो. तीसपेक्षा जास्त वर्षे एकहाती सत्ता नवी मुंबईत असूनही मात्र झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत एक तरी परिपत्रक आणले असेल तर दाखवा असे आव्हान त्यांनी नाईक यांना दिले आहे.

३१ जुलैपर्यंत झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत तोडगा निघाला नाही तर एक ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा विजय चौगुले यांनी मंगळवारी पार पाडलेल्या पत्रकार परिषदेत दिला. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना नवी मुंबईत महायुती घटक पक्षांतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटांच्या नेत्यांत झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून तू तू मी मी सुरू झाले आहे.

हेही वाचा : अमर रुग्णालयाची वैद्यकीय सेवा संशयाच्या भोवऱ्यात

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनवर्सनासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण चिंचपाडा येथे २१ सप्टेंबर २०२३ पासून सुरू केले होते. ३०० पेक्षा अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्णही झाले होते. मात्र गणेश नाईक यांनी मंत्रालयात प्रयत्न करून सर्वेक्षण थांबवले असा आरोप चौगुले यांनी केला.

गणेश नाईक यांना झोपडपट्टीवासीयांची एवढीच काळजी होती तर त्यांनी पावसाळी अधिवेशनात का मुद्दा उचलला नाही, सिडकोच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र स्वत: सत्तेत असताना सिडकोने दिलेला भूखंड अधिकार नसतानाही मनपानेही खासगी विकासकाला विकण्यात आला. त्याच्यावरच सतरा प्लाझा इमारत उभी आहे. तेव्हाच्या भ्रष्टाचाराचे काय असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा : दलालांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन; जनतेत योग्य संदेश जात नसल्याची गणेश नाईकांची टीका

गणेश नाईक हे झोपडपट्टी पुनवर्सनाबाबत दिशाभूल करत असून १० चटई क्षेत्राचा कुठेही विषय नसताना उगाच १० चटईक्षेत्र दिले तर पायाभूत सुविधांवर ताण पडेल असा आरोप नाईक यांनी केला. बोनकोडेमध्ये किती बेकायदा इमारती आहेत त्यांचा ताण पायाभूत सुविधांवर पडत नाही का? आम्हीही बोनकोडे कोपरखैरणेत जेवढे चटई क्षेत्र दिले, तेवढेच झोपडपट्टी पुनर्वसनाला देण्यात यावे अशी मागणी करीत आहोत. दिघ्यातील गणपती पाडा, ईश्वरनगर, रामनगर, साठे नगर, विष्णू नगर, विजय नगर, रामजी आंबेडकर नगर, चिंचपाडा, ऐरोलीत ऐरोली नाका, समता नगर शिव कॉलनी, रबाळे येथील आंबेडकर अंगार, भीमनगर, घणसोलीतील अर्जुनवादी, महापे येथील संभाजीनगर, पावणेगाव, अडवली भुतावली अशा एकूण २८ झोपडपट्टी असून त्यात सुमारे एक लाख लोक राहतात.

नवी मुंबईतील भाजप नेते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासमवेत एकदिलाने काम करीत नाहीत. लाडकी बहीण योजना आणल्यावर सर्वत्र शिवसेना, भाजप कार्यकर्ते स्थानिक नेते एकदिलाने या उपक्रमाचे काम करत आहेत. मात्र नवी मुंबईत भाजप नेत्यांकडून साधा एक फलक लावण्यात आला नाही. एवढेच नाही तर आम्ही निवडणुकीत मन लावून काम केले म्हणून आमदारकीला ४० हजारांचे मताधिक्य नाईक यांना मिळाले. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ ९ हजारांचे मताधिक्य मिळाले, असा आरोप चौगुले यांनी केला.

हेही वाचा : पनवेल महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार

झोपडपट्टी पुनर्वसन श्रेय शिवसेनेला मिळू नये म्हणून गणेश नाईक पुनर्वसनात खोडा घालत आहेत. हे पुनर्वसन शासनच करणार आहे. ३१ जुलैपर्यंत तोडगा निघाला नाही तर १ ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्यात आहे. ही लढाई सरकारविरोधात नाही तर गणेश नाईक यांच्या विरोधात आहे.

विजय चौगुले ( शिवसेना शिंदे गट, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष)