उरण : पापलेट, सुरमईवर ताव मारायला सर्वच मासेप्रेमींना आवडत असले तरी हे मासे परवडत नसल्याने सर्वसामान्यांची पावले वळतात ती ‘बॉम्बे डक’ अर्थात बोंबील माशांकडे. पावसाळ्यात तळलेले कुरकुरीत बोंबील म्हणजे पर्वणी. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी बोंबिल खाण्याची हौस भागवली जाते. सध्या या बोंबील माशांची आवक सुरू आहे. पण ती कमी असल्याने बाजारात २०० रुपयांना पाच बोंबील अशा भाव वधारला आहे. दर दुप्पट झाल्याने सर्वसामान्यांना बोंबीलही परवडेनासे झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आवक कमी असल्याने बाजारात दोनशे रुपयांना पाच नग असा बोंबील माशांचा दर आला आहे. या कडाडलेल्या दरामुळे खवय्यांना अधिकच खर्च करावा लागत आहे. हा दर दुप्पट असून सर्व साधारण पाच नगाचे १०० रुपये लागतात. तर आवक अधिक असल्यास दहा नग ५० रुपयातही विकले जातात. बोंबील मासे तसे वर्षभर येत असले तरी पावसाळ्यात मिळणारे बोंबील हे आकाराने मोठे असतात. त्यामुळे खवय्यांना खास करून पावसाळ्यात येणाऱ्या बोंबील माशांची प्रतीक्षा असते. त्यातच सध्या समुद्रात पापलेट आणि सुरमई सारखे मासे कमी प्रमाणात सापडत असल्याने या मासळीचे दर सामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे खवय्ये बोंबील माशाकडे वळले आहेत. मात्र सुरुवातीला आवक कमी असल्याने बोंबील मासळीचे दर कडाडले आहेत.

हेही वाचा : पनवेल: सिडकोची ४८ भूखंड, २१८ दुकानांची सोडत, दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस आजपासून सुरुवात

जून व जुलै या दोन महिन्यांसाठी सलग ६१ दिवसांसाठी शासनाने खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश दिल्याने राज्यातील मासेमारी ठप्प झाली असून यामुळे उरण परिसरातील सुमारे ७५० मच्छीमार नौकांनी विविध बंदरात नांगर टाकून विसावल्या आहेत. त्यामुळे मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असल्याने मासळीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या बंदीमुळे दोन महिने खवय्यांना ताज्या माशांचा आस्वाद घेता येणार नाही. उरणच्या करंजा,मोरा, रेवस, मुळेखंड आदि विविध बंदरात नांगर टाकला आहे.पावसाळी मासेमारी बंदीमुळे मासळीचा तुटवडा जाणवत असल्याने खवय्यांचे चांगलेच हाल होत आहेत.

याआधीचे दर आजचे दर (प्रति किलो)

पापलेट ८०० ते ९०० १२०० ते १५००

सुरमई ६०० ते ७५० ९०० ते १०००

कोळंबी २५० ते ४०० ७५० ते ८००(आकारानुसार दर)

रिबनफिश १५० ते २०० २५० ते ३००

हलवा ४५० ७५० ते ८००

माकुळ ७० ते १५० ३०० ते ४००

रावस ७०० ते ८०० ९०० ते १०००

जिताडा १००० १२०० कि

बांगडा २५० ते ३०० ३५० ते ४००

हेही वाचा : रानसई धरण तुडुंब, मुसळधार पावसाने धरण भरल्याने उरणकरांची जलचिंता दूर

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्र राज्याच्या दोन महिने आधीच मासेमारी बंद करण्यात येते. राज्यातील पावसाळी बंदीनंतर पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारीला सुरुवात होते.त्यामुळे चांगल्या प्रतीची मासळी कोलकाता तसेच गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल येथून कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी मुंबईत येत असते. मात्र या मासळीचे भावही आवाक्याबाहेर असल्याने खवय्यांच्या परवडत नाहीत.

विनायक पाटील, मच्छीमार
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran bombil fish price increased to rupees 200 for 5 fish css