उरण : १६ व १७ जानेवारी १९८४ रोजी शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वातील सिडको आणि सरकारच्या भूसंपदानाच्या विरोधात झालेल्या संघर्षमय लढ्यात पाच शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले. या लढ्याला मंगळवारी ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात आंदोलनातील पाचही हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि वारसांनी हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव नेते आणि प्रकल्पग्रस्तांना उरली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे आम्हाला ना मानसन्मान मिळाला ना कुणाकडून साधी विचारपूस केली जाते अशाही भावना या वेळी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१६ जानेवारीला दास्तान फाटा येथील गोळीबारात नामदेव शंकर घरत (चिर्ले) व रघुनाथ अर्जुन ठाकूर(धुतुम) तर दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला नवघर रेल्वे फाटकावर जमलेल्या शेतकऱ्यांवरही झालेल्या गोळीबारात कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील (पागोटे) या पिता-पुत्राने हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांच्या दोन्ही दिवसांच्या अभिवादन कार्यक्रमात प्रकल्पग्रस्तांची अल्प उपस्थिती असल्याने हुतात्म्यांच्या बलिदानाची भूमिपुत्रांना जाणीव राहिली नसल्याचे मत व्यक्त करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : खारघरमध्ये दिसणारा ‘तो’ प्राणी कोणता? वन विभाग कर्मचाऱ्यांचे पथक तैनात

उरणमधील जासई या दिबांच्या मूळ गावात हुतात्म्यांचे स्मारक आहे. या स्मारकात दरवर्षी १६ जानेवारीला हुतात्मा दिन साजरा केला जात आहे. याही वर्षी तो साजरा केला जात आहे. या शेतकरी आंदोलनात पागोटे येथील महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील हे एकाच घरातील पितापुत्र आंदोलनातील हुतात्मा झाले आहेत. त्यांचे चिरंजीव अरुण पाटील यांनी आमच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे सांगून आमच्या कुटुंबाची साधी चौकशीही केली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे हुतात्मादिनी तरी नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र अभिवाद करण्याची इच्छा ही त्यांनी व्यक्त केली आहे. तर धुतुम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे वारस लक्ष्मण ठाकूर यांनी शेतकरी हुतात्म्यांच्या वारसांना वाऱ्यावर सोडण्यात आले असून नेत्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नसल्याचे सांगत हुतात्म्यांच्या वारसांना तसेच गावांच्या विकासाची मागणी त्यांनी या वेळी केली आहे.

हेही वाचा : पनवेल : पालक ओरडतील या भीतीने विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न

तसेच नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबरोबरच पाचही हुतात्म्यांचे पुतळे उभारण्यात यावे अशीही मागणी केली आहे. तर हुतात्मा नामदेव घरत यांचे चिरंजीव जितेंद्र नामदेव घरत यांनी हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एखाद्या प्रकल्पाला नाव देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात दिबांचे चिरंजीव अतुल पाटील यांनी हुतात्मा दिन हा या आंदोलनाचे स्मरण करण्यासाठी आयोजित केला जात असून त्यात काही त्रुटी असतील मात्र सर्वांनी त्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

प्रकल्पग्रस्तांचे रोजगार आणि पुनर्वसनाचे हक्क प्रस्थापित न झाल्याने ज्या उद्दिष्टांसाठी त्याग केला ते सफल होत नसल्याने हुतात्म्यांचे रक्त आणि त्याग वाया जात असल्याचा संताप आंदोलनातील गोळीबार जखमी प्रमोद ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची हत्या, पत्नी आणि वाहन चालक आरोपी, वाहन चालकास अटक

जासईत कार्यक्रम का?

माझी आणि भावाची मुले उच्चशिक्षित असूनही बेरोजगार आहेत. तर पागोटे येथील हुतात्मा कमलाकर तांडेल यांचे ज्येष्ठ बंधू हसुराम तांडेल यांनी पागोटे गावातील तीन शेतकरी हुतात्मे झाले, मात्र हुतात्मा दिन कार्यक्रम जासईत का असा सवाल केला आहे. नवघर रेल्वेजवळ जेथे हे तीन हुतात्मे झाले तेथे हुतात्म्यांचे स्मरण राहावे याकरिता रेल्वेकडून एका ठिकाणाची मागणी करणे तसेच न्हावा शेवा रेल्वे स्थानकाचे हुतात्मा स्मारक नवघर असे नामकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran the movement led by leader db patil against farmers land acquisition completed 40 years css
Show comments