वाशी मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात समितीत सध्या सफरचंद, डाळींब आणि सीताफळ या फळांचा हंगाम सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये अंजीर फळ बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. पंरतु यंदा अवेळी पावसाने हंगामाला उशिरा सुरुवात झाली आहे. वातावरणात आता कडाक्याची थंडी पडली असल्याने अंजीरच्या उत्पादनाला फटका बसत आहे. त्यामुळे मंगळवारी एपीएमसीत अंजीरची आवक कमी झाली आहे.
हेही वाचा- नवीन लसणाने जुन्याचे दर वधारले; एपीएमसीत प्रतिकिलो ८० ते ११० रुपयांवर
पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथून अंजीर दाखल होत असून, नोव्हेंबर ते मे महिन्यांपर्यत अंजीर फळाचा हंगाम सुरू असतो. मात्र, आता पारा घसरत आहे. अंजीरला उष्णदमट हवामान पोषक ठरते. अधिक कडाक्याच्या थंडीने अंजीर पिकाची वाढ खुंटली असल्याने आवक कमी झाली असल्याचे मत फळ व्यापारी व्यक्त करीत आहेत. फळ बाजरात ४-५गाड्या दाखल होणारे अंजीर आता मात्र दोन गाड्या दाखल झाले आहे. आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. एपीएमसी घाऊक बाजारात आधी ४ डझन अंजीरला १०० ते ३०० रुपये बाजारभाव होते . ५० रुपयांनी वाढ झाली असून आता १५० ते ३५०रुपयांवर गेले आहे. तसेच अंजीर फळाचा पहिला बहर देखील संपला असून दुसरा बहर सुरू होणार आहे. त्या कालावधीत दरम्यान अंजिराचे भाव चढेच राहणार आहेत.