लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : आतापर्यंत जेएनपीए बंदरातील कंटेनर हाताळणीने उच्चांक गाठला असून ३५ वर्षांच्या कालावधीत ७० लक्ष कंटेनर हाताळणी केली आहे. हा बंदरासाठी गौरव क्षण असल्याचे जेएनपीए कडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
गेल्या ३५ वर्षात जेएनपीएने कार्यक्षमतेच्या निकषांमध्ये सुधारणा करीत सातत्याने स्वत:ला विकसित केले आहे. यात येथील परिसरात उच्च स्थराचे शिक्षण, निसर्ग संवर्धन, नागरी सुविधा बरोबरच कामगिरीमध्ये व जहाजांच्या ड्वेल टाइममध्येही सुधारणा केली आहे सफल विविध विस्तार योजनांमुळे आणि २०२५ मध्ये जेएनपीए १९८९ ला एक लाख कंटेनर हाताळणी करणारे बंदर ७० लक्ष कंटेनर मालाची हाताळणी करणारे देशातील एकमेव बंदर ठरले आहे. आधुनिकीकरण आणि कामगिरीच्या जोरावर देशातील पहिल्या क्रमांकाचे युवा पोर्ट म्हणून गणले जात आहे. तर जागतिक स्तरावरही २६ व्या क्रमांकावर पोहोचून जेएनपीएने वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
जेएनपीएमध्ये अनेक नवीन उपक्रम,प्रकल्प आहेत. जे देशात प्रथमच सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक न्हावा -शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी) होय. जुलै १९९७ मध्ये सुरू झालेले हे टर्मिनल देशातील बंदर क्षेत्रात सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून (पीपीपी) सुरू झालेले पहिलेच कंटेनर टर्मिनल आहे. ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्वावर हे टर्मिनल अद्यापही सुरू आहे. येत्या काही महिन्यात आणखी काही मोठे प्रकल्प व महत्वाचे उपक्रम कार्यान्वित होतील. या सर्व उपक्रमांमुळे जेएनपीएला पुढील दशकात परिवर्तनाच्या पुढच्या टप्प्यात पोहचणार आहे.