नवी मुंबई : नवी मुंबईतील बहुतांश खाडींच्या ठिकाणी जेट्टी असली तरी वाशी खाडीतील जुहू गाव चौपाटीवर व्यवस्थित बांधलेली जेट्टी नसल्याने या ठिकाणी मच्छीमारांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने जेट्टी बांधावी अशी मागणी होत आहे.

नवी मुंबई शहर वसण्याआधी या ठिकाणी भूमिपुत्रांचा शेती आणि मासेमारीचा मुख्य रोजगार होता. कालांतराने शहर वसल्यानंतर शेती व्यवसाय संपुष्टात आला तर आजही शहरातील गावात असलेल्या जेट्टींवर मच्छीमारांचा व्यवसाय सुरू असतो. यामधून या स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतो. जेट्टीवर खाडीकिनारी आपल्या बोटी लावतात.

हेही वाचा – खारघरच्या मेडीकव्हर रुग्णालयाला ‘बॉम्ब’ धमकीचा मेल

हेही वाचा – उरणमध्ये विजेचा लपंडाव, शहर तसेच ग्रामीण भागांतील नागरिक संतप्त

शहरातील बहुतांश ठिकाणी सुसज्ज अशी जेट्टी उभारण्यात आल्या आहेत. मात्र जुहूगावात अद्यापही सुसज्ज अशी जेट्टी उपलब्ध नाही. जुहू गावातील मच्छिमार वाशी खाडीत मासेमारी करत असून त्यांच्या होड्या जुहू चौपाटी किनारी लावल्या जातात. मात्र या ठिकाणी सुसज्ज अशी जेट्टी, पिण्याचे पाणी, विद्युत रोषणाई नसल्याने मच्छीमारांची मोठी गैरसोय होते. या ठिकाणी प्रशासनाने जेट्टी बांधावी अशी मागणी किशोर पाटील यांनी केली आहे.