उरण : महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये स्वातंत्र्यासाठी दिलेल्या कायदेभंग आंदोलनात ब्रिटिश सरकारच्या गोळीबारात येथील आठ स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. या हुतात्म्यांची स्मारके त्यांच्या मूळ गावी उभारण्यात आली आहेत. या स्मारकांची दुरवस्था झाली असून त्यांची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. मात्र याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती या दोन्ही विभागाकडून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२५ सप्टेंबर १९३० ला उरणच्या चिरनेर जंगलात ब्रिटिश सरकारचा कायदा मोडीत सत्याग्रहात आठ जणांनी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णपान असलेल्या या हुतात्म्यांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी सरकारने १९८० च्या दशकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आली आहेत. यामध्ये धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर)आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे)

हे ही वाचा…सागरी किनारा रस्त्यासाठी हजारो झाडांचा बळी? बेलापूरमध्ये मानवी साखळी आंदोलन करत नागरिकांचा तीव्र विरोध

परशुराम रामा पाटील (पाणदिवे) रामा बामा कोळी (मोठी जुई) आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रघुनाथ मोरेश्वर शिंदे (कोप्रोली) हसूराम बुधाजी घरत (खोपटे) नाग्या महादू कातकरी (चिरनेर)यांची चिरनेर, दिघोडे,धाकटी जुई,मोठीजुई,कोप्रोली,खोपटे व पाणदिवे या मूळ गावी हुतात्मा स्मारके उभारली आहेत.

या सर्व समारकांची (चिरनेर वगळता) दुरवस्था झाली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाची प्रेरणस्थळे असलेली ही स्मारके जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत आहेत. यातील काही स्मारकांचा गावातील नागरिक आपले खाजगी साहित्य घेण्यासाठी तसेच इतर कामांसाठी करीत आहेत. स्मारकाच्या फरशा उखडल्या आहेत. छप्पर उडाले आहेत. छत गळून पडले आहेत. त्याचप्रमाणे संरक्षक जाळ्याही तुटल्या आहेत. यातील अनेक स्मारकांची पडझड झाली आहे. त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. परंतु या स्मारकांची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची की ग्रामपंचायत आणि पंचायत समिती हे निश्चित होत नसल्याने यात भर पडू लागली आहे.

हे ही वाचा…प्रकल्पस्तांच्या मतांसाठी महायुतीची अखेरची धडपड, गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याचा अखेर निर्णय

सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकांची उभारणी केली आहे. मात्र त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबादारी आमच्या विभागाची नसून ही स्मारके स्थानिक ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली आहेत. – नरेश पवार, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

स्मारके स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत कडे असली तर त्याची किरकोळ दुरुस्ती करणे शक्य आहे. मात्र या स्मारकांच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागालाच पुढे यावे लागेल.- समीर वठारकर, गटविकास अधिकारी, उरण पंचायत समिती.

हे ही वाचा…पनवेलमधील पाणी पुरवठा बंद

बुधवारी ९४ वा स्मृतीदिन

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४ व हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यात येणार असून यासाठी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर,माजी आ. मनोहर भोईर, बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्याोगपती पी.पी. खारपाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, जेएनपीटीचे चेअरमन उन्मेश वाघ, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राजिपचे मुख्य कार्यअधिकारी भरत बास्टेवाड आदीजण उपस्थित राहणार असल्याची माहिती सरपंच भास्कर मोकल यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Martyrs memorials erected in their native villages these monuments are dilapidated and need to be reconstructed sud 02