नवी मुंबई : नवी मुंबईकरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरून सातत्याने येत असलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दिवसातून दोन वेळा पाणी सोडण्याऐवजी एकदाच सहा ते सात तास पाणी वितरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना सलग सहा ते सात तास पाणीपुरवठा होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा प्रभाव पाहून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वत:च्या मालकीचे धरण असलेली महापालिका म्हणून नवी मुंबईचा लौकीक असला तरी गेल्या काही वर्षांपासून मोरबे धरणाचे पाणी शहराला अपुरे पडू लागले आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात धरणात केवळ ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पालिकेने २८ एप्रिलपासून शहरात आठवड्यातून एक दिवस विभागवार पाणीकपात लागू केली. त्याअंतर्गत आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. मोरबे धरण १०० टक्के भरल्यानंतरही महापालिकेने पाणीकपात अधिकृतपणे मागे घेतलेली नाही. मात्र, शनिवारपासून (दि. १४) पाणी वितरणाच्या वेळेत बदल लागू केला आहे.

हेही वाचा : उरणमधील वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका, उपाययोजना कागदावरच

नव्या नियोजनानुसार दिवसातून एकदाच सहा ते सात तास नागरिकांना पाणी मिळणार आहे. यासाठी पालिकेने तीन वेळा निश्चित केल्या असून बेलापूर ते कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली-दिघा अशी विभागणी करण्यात आली आहे. सध्याच्या नियोजनानुसार संपूर्ण शहरात साधारणपणे सकाळी आणि संध्याकाळी एकाच वेळेत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, पाण्याचा दाब, भौगोलिक अंतर आदी कारणांमुळे काही विभागांना जास्त तर काहींना कमी पाणी मिळते. वितरणातील ही विषमता दूर करण्यासाठी पालिकेने वेळापत्रक बदलल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच प्रमाणे मूळ गावठाणांनाही योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने नियोजन केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.

हेही वाचा : शवागारामुळे पनवेल शहरात दुर्गंधी

“नवी मुंबई शहरात सर्वच विभागात योग्य दाबाने व आवश्यक तेवढा पाणीपुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून प्रायोगिक तत्वावर पाणीपुरवठ्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वांनाच योग्य व सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पालिकेचे हे नियोजन आहे” – संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका

हेही वाचा : उरणमध्ये शारदोत्सवात गावदेवींचा जागर तर घरोघरी पारंपरिक घटस्थापना

वाशीत जुनेच वेळापत्रक

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले असले तरी वाशी विभागात सध्या जुन्या वेळापत्रकानुसारच पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. वाशीतील दोन जलकुंभांचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर वाशीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक

बेलापूर ते कोपरखैरणे : पहाटे ४.३० ते सकाळी ११.३०

घणसोली : सायं. ८.३० ते रात्री २

ऐरोली व दिघा: रात्री दोन ते सकाळी ८

सारसोळे, नेरुळमधील नागरिकांचा मोर्चा

अनेक महिन्यांपासून पाणी समस्येचा सामना करावा लागत असलेल्या नागरिकांनी सोमवारी शहर अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. कुकशेत, सारसोळे, नेरुळ कॉलनी परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहर अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी नगरसेवक सूरज पाटील यांचाही यात सहभाग होता. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या म्हणत महिलांनी निवेदन दिले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation continuous water supply for 6 to 7 hours in a day css
Show comments