पनवेल :  नवी मुंबई पोलीसांना प्रामाणिक दलाचा दर्जा मिळावा यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा मलईदार बदल्यांमधील भ्रष्टाचार थांबवून सगळ्याच पोलीस निरिक्षकांना सूखद आश्चर्याचा धक्का दिला. अधिकाऱ्यांना मलईदार पदांसाठी एकही रुपया मोजावा लागला नाही तर ते भ्रष्टाचार करणार नाहीत अशी मनिषा आयुक्तांची होती. परंतू मागील दोन आठवड्यात घडलेल्या भ्रष्टाचाराच्या विविध घटनांमुळे आयुक्तांनी पुन्हा एकदा बदलीचे शस्त्र उघारले आहे. 

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस दलातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सफाईची मोहीम हाती घेतली. मात्र मोफत मलाईदार पद मिळवूनही अधिकारी व कर्मचा-यांकडून भ्रष्टाचार थांबत नसल्याने आयुक्तांनी एका बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिका-यांसमोर संताप व्यक्त केला. ५ ऑक्टोबरला कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांची तडकाफडकी पोलीस ठाण्यातून बदली करुन त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले. राजेंद्र कदम यांच्या जागी वाहतूक विभागात काम करणारे श्रीकांत धरणे यांची नेमणूक करण्यात आली. यापूर्वी ९ ऑक्टोबरला एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश कदम यांना मध्यरात्री ५० लाख रुपयांच्या मागणी केल्याप्रकरणी लाचेच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

हेही वाचा : कळंबोली येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस सरसावले, पहिल्याच दिवशी रस्ता अडविणाऱ्या चालकांवर सहा फौजदारी गुन्हे दाखल

ईमारतीच्या दुर्घटना प्रकरणात गुंतवणूकदाराकडून पोलीस निरिक्षक सतीश कदम याने १४ लाख रुपये स्विकारल्यानंतर अजून त्याला १२ लाख रुपये पाहीजे होते. हीच रक्कम घेताना पोलीस निरिक्षक कदमला पोलीसांनी पकडले. कळंबोली पोलीसांचा लोखंड बाजार व परिसरात चालणा-या काळ्या धंद्याची लेखी माहिती एका भंगार व्यवसायीकाने पोलीस आयुक्तांकडे दिली. महिन्याला या पोलीस ठाण्याच्या प्रभारींना ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये विना कागदपत्रांची वाहने विल्हेवाट करणारी मोठी टोळी लोखंड पोलाद बाजारातील २२ गाळ्यांमध्ये सक्रीय आहे. या मोठ्या दुकानदारांकडून वाहनांचे सुटे भाग विकणारी ३५ दुकाने या परिसरात आहेत. यांना पोलीसांचा आशिर्वाद लागतो. जुन्या लोखंडाला नवीन कलई लावून बनावट विक्री करणारे लोखंड व पोलादाचा बेकायदा व्यापार कळंबोली लोखंड बाजारात चालतो. त्यालाही पोलीस आशिर्वाद देत असल्याचे बोलले जाते. पोलीस आयुक्त भारंबे यांच्या आदेशाने लोखंडी सळई व इतर साहीत्य वाहतूकदारांकडून खरेदी करणारा इम्तिहाज नावाच्या भंगार माफीयावर कारवाई केली होती. हा व्यवसाय पुन्हा सूरु झाल्याचे येथील व्यापारी सांगतात. या बाजारात दिडहजाराहून अधिक गाेदाम आहेत. येथील माल आठवड्यातून दोन वेळा चोरी करणारी चोरट्यांच्या टोळीचे व पोलीसांचे साटेलोटे असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : अभिनेता सलमान खानच्या पनवेलच्या शेत घराबाहेरील टेहळणी प्रकरणातील आरोपीला हरियाणातून अटक

बेकायदा वाहनतळ चालविणे आणि सरकारी अन्न गोदामातून रेशनींगचा माल अवैधरित्या कळंबोलीतून पास करणे यासाठी पोलीसांचा आशिर्वाद घ्यावा लागतो. दोन लेडीज सर्व्हीसबार यांच्यासह अनेक काळेधंदे कळंबोली पोलीस ठाण्याच्या परिसरात असल्याने या प्रभारीला माफीयांचा सलाम मिळाल्याशिवाय या परिसरात काहीच हालचाली होत नाहीत. कळंबोलीप्रमाणे पनवेलमध्ये रात्री उशीरा चालणारे लेडीज सर्व्हीसबारमध्ये डान्सबार आणि शेडुंग फाट्याजवळील तेल, गॅस, चोरीचा माल खरेदी कऱणा-या अवैध धंद्यांमुळे पोलीस आयुक्तांचा धाक पनवेलमध्ये शिल्लक नसल्याची चर्चा आहे. पोलीस आयुक्त भारंबे यांनी हीच काळ्याधंद्यांची प्रथा बदलण्यासाठी पोलीस ठाण्याला श्रीकांत धरणे यांच्यासारख्या अधिका-याची नेमणूक केली. पोलीस आयुक्तांनी प्रामाणिक व आधुनिक पोलीस दल बनविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. नियंत्रण कक्षासोबत अत्याधुनिक फॉरेन्सीक तपास यंत्रणेसह, सायबर सेल व पेपरलेस कार्यपद्धत आणली. भ्रष्टाचार रोखण्यासाठी मीही घेत नाही, तूम्हीही घेऊ नका, असा संदेश पहिल्या दिवसापासून प्रभारींना दिला. पोलीसांच्या मुलांना नोकरी मिळावी यासाठी आयुक्तांनी औद्योगिक वसाहतीमध्ये कारखानदारांसोबत समन्वय साधले. पोलीस पत्नींना उद्योग व व्यवसायात पुढे यावे यासाठी पोलीस दलात विविध प्रयोग सूरु आहेत. तरी पोलीसांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांच्यासोबत त्यांचे पैसे गोळा करण्यासाठी नेमलेले तीन पोलीस कर्मचाऱ्यांचीसुद्धा बदली करुन पोलीस आयुक्तांनी कलेक्टर संस्कृती नष्ट करण्याचे संकेत दिले आहेत.