नवी मुंबई: मुंबईत प्रवेश करताना असणाऱ्या पाचही पथकर नाक्यावर हलक्या वाहनांचा पथकर राज्य शासनाने माफ केला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आज सकाळपासून वाशी आणि ऐरोली पथकर नाक्यावर मनसेकडून वाहन चालकांना पेढे वाटप करून होत आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईमध्ये प्रवेश करताना लागणारे पथकर नाके वाशी, दहिसर, ऐरोली, मुलुंड आनंदनगर या ठिकाणी हलक्या वाहनांना पथकरमधून वगळले आहे. त्यामुळे रोज हजारो गाडी चालकांना त्याचा फायदा होणार आहे, तर कोट्यधी रुपयांचा फटका राज्य शासनाला बसणार आहे. पथकर रद्द करावा म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक वर्षांपासून मागणी करीत अनेक आंदोलनेसुद्धा केली होती. त्यामुळे आजपासून सुरु असलेल्या हलक्या वाहनांना पथकर माफीचा जल्लोष मनसे कार्यकर्ते करीत आहेत.

हेही वाचा – नवी मुंबई: एनआरआय संकुलातील सदनिकेत भीषण आग

हेही वाचा – Airoli Assembly constituency : महायुती आणि मविआत अंतर्गत रस्सीखेच; ऐरोलीसाठी कोण ठरेल वरचढ?

ऐरोली पथकर नाक्यावर मनसे शहर अध्यक्ष निलेश बाणखिले तर वाशी पथकर नाक्यावर मनसे प्रवक्ते गजानन काळे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पोहेचले, त्यांनी जल्लोष साजरा करीत राज ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या, तसेच पथकर कर्मचारी आणि हलक्या वाहनांचे चालक प्रवासी यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.